पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर समीकरणेही बदलणार
पुणे – पाच पैकी चार राज्यांत भाजपची सत्ता स्थापन आल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह पुणे महापालिकेच्या निवडणुकीवरही होण्याची दाट शक्यता असून पुणे महापालिका निवडणुकीची समीकरणेही बदलणार आहेत.
भाजपमधील सुमारे 17 ते 18 जण राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, हा निवडणूक निकाल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोथरूडच्या सभेनंतर भाजप सोडण्याबाबत तळ्यात-मळ्यात असलेले काठावरचे नगरसेवक भाजपमध्येच थांबतील, असे चित्र निर्माण झाले आहे. या निकालानंतर महागाई, पेट्रोल दरवाढ, विकास, भ्रष्टाचार अशा मुद्यावर भाजपला घेरण्याची तयारी केलेल्या विरोधकांना आता निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.
पुणे पालिका निवडणुकांसाठी नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेत यासाठीच राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. तर ही प्रभाग रचना अनुकूल असल्याचे सांगत, पुण्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात स्वबळाचा नारा देत 122 नगरसेवक निवडून येतील, असा दावा केला होता. तर भाजपचे 19 जण संपर्कात असून त्यातील 16 जण राष्ट्रवादीत येणारच, असे सांगण्यात येत होते.
मात्र, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर्चस्मा कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे, भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी असलेले अनेक जण पुन्हा भाजपमध्येच थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
15 मार्चनंतर चित्र स्पष्ट होणार…
महापालिका निवडणुका जवळ आल्यानंतर पुण्यात भाजपला खिंडार पाडण्याचे महाविकास आघाडीचे नियोजन होते. मात्र, नगरसेवकांनी राजीनामे देऊन राष्ट्रवादीत येण्यापूर्वी 15 मार्चला मुदत संपल्यानंतर यावे, असे त्यांना सांगण्यात येत होते. त्याच वेळी, पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र भाजपचे नगरसेवक मुदत संपण्यास अवघे काही दिवस असतानाही राजीनामे देऊन राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करीत आहेत. पुण्यात मात्र अद्याप एकही भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत गेलेला नाही. आता, चार राज्यांतील निकालानंतर नगरसेवकांना थांबविण्याचे काम भाजपला सोपे होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात हे नगरसेवक काय भूमिका घेतात हे दि. 15 मार्चला नगरसेवक पदाची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे.