लेखाजोखा
मुरलीधर मोहोळ, महापौर,पुणे
मुलाखत भाग-१
पुणे – मेट्रो प्रकल्प पुण्याची वाहतूक संस्कृती बदलणारा ठरणार आहे. नागरीकरणामुळे जटील होत जाणाऱ्या वाहतूक समस्येवर शाश्वत स्वरूपाची उपाययोजना करताना नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार पार पाडण्याची आवश्यकता होती. मेट्रो पाच वर्षांत प्रत्यक्षात आल्यामुळे व्यवस्थेवरचा विश्वास दुणावला. स्वच्छतेच्या बाबतीतही पुण्याने जनसहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही दुहेरी नीती वापरली. याविषयी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी साधलेला हा संवाद.
बहुप्रतीक्षित “पुणे मेट्रो’चा प्राधान्य टप्पा नुकताच कार्यान्वित झाला आहे. पुण्यासाठी हा प्रकल्प का आवश्यक होता?
जवळपास एक दशक केवळ कागदावर असलेली “पुणे मेट्रो’ भूमिपूजनानंतर केवळ पाच वर्षांत प्रत्यक्षात आणून आम्ही शहराच्या विकासाला गती दिली आहे.
खासगी वाहनांची संख्या वेगाने वाढत असताना त्या प्रमाणात रस्ते व उड्डाणपुलांची निर्मिती होऊ शकत नाही. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन इंधन, वेळ वाया जातो आणि नागरिकांच्या मनस्तापात भर पडते. वाढत्या पुण्याला गरजेच्या आणि भविष्याच्या दृष्टीने पुरेशा पायाभूत सुविधांची निर्मिती हा आमचा ध्यास मेट्रोमुळे प्रत्यक्षात येत आहे. “पुणे मेट्रो’चे तिन्ही मार्ग पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
‘पुणे मेट्रो’मुळे शहरांतर्गत वाहतुकीचे चित्र खरोखर बदलेल का?
सध्याच्या विकास आराखड्यातील अंदाजानुसार येत्या चार वर्षांत पुण्यात एकूण 70 लाख वाहने असतील. हा आकडा मर्यादित ठेवण्यासाठी भक्कम सार्वजनिक व्यवस्था मेट्रोमुळे उभी राहत आहे. मेट्रोचा वापर केल्यास अत्यंत कमी खर्चात सुरक्षित व वेगवान प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रो मार्गांचा पूर्ण विस्तार झाल्यानंतर पुण्याच्या परिघावर असणारी गावेही विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील. त्यामुळे येत्या आठ ते दहा वर्षांत मेट्रोच्या तिन्ही मार्गांवरील एकूण दैनंदिन प्रवासीसंख्या 10 लाखांहून अधिक असणार आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुणे महापालिका काय प्रयत्न करीत आहे?
पुणे शहरात सध्या दररोज 2,000 ते 2,100 टन घनकचरा निर्मिती होते. याशिवाय दरमहा सरासरी 3,270 टन इलेक्ट्रॉनिक कचराही गोळा केला जातो. शहरातील कचरा प्रकल्पांची क्षमता केवळ 539 मेट्रिक टन एवढी आहे. त्यामुळे रोज साधारणत: 250 ते 300 मेट्रिक टन सुका कचरा प्रक्रियेविना शिल्लक राहतो. कचरा प्रकल्पांची क्षमता वाढविणे, नवे प्रकल्प तयार करणे आणि या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविणे ही त्रिसूत्री गेल्या पाच वर्षांत महापालिकेने राबविली. यामुळे शहरात आता सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे 10, तर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे 24 प्रकल्प सुरू झाले आहेत. याशिवाय 19 बायोगॅस प्रकल्प व ई-कचरा संकलनासाठी 13 कायमस्वरूपी आणि 21 हंगामी केंद्रांचीही स्थापना केली आहे.
या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने कोणती पावले उचलली?
नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या व रॅपर्स जमा करणारे “स्वच्छ एटीएम मशीन’ सुरू करण्यात आले आहे. यात कचरा जमा करणाऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणार आहे. याशिवाय मोठ्या गृहप्रकल्पांनी ओला कचरा जागेवरच जिरवावा, यासाठी महापालिकेने प्रोत्साहन दिले आहे. आतापर्यंत पुण्यातील 1,403 सोसायट्या व संस्थांनी ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी प्लॉगेथॉनचेही यशस्वी आयोजन करण्यात आले. पुण्यात आज एक किलोही कचरा प्रक्रियेवाचून राहत नाही. परिणामस्वरूप “स्वच्छता स्पर्धे’त पुणे 27 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “पुणे मेट्रो’स हिरवा झेंडा दाखवत सुखद, पर्यावरणपूरक आणि वेगवान सार्वजनिक वाहतुकीचे नवे पर्व पुणेकरांसाठी सुरू केले आहे. 2014 मध्ये त्यांनीच सुरू केलेल्या “स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत शून्य कचरा धोरण अवलंबत शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी महापालिका कायम प्रयत्नशील राहिली आहे.