डॉ. चिमा उद्यान येथे 45 मीटर तिरंगा ध्वजस्तंभाचे उद्घाटन
“आगामी निवडणुकीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील’
येरवडा – भाजपचे नेते किरीट सोमय्या व नारायण राणे यांच्याकडून ठाकरे कुटुंबीयांवर आरोपांवर होत आहेत. पण, आपण किती लक्ष द्यावे हे आपण ठरवावे,’ अशा शब्दांत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.
येरवडा येथील डॉ. चिमा उद्यान येथे उभारण्यात आलेल्या 45 मीटर तिरंगा ध्वजस्तंभाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सहायक आयुक्त वैभव कडलख, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, पालिका गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक संजय भोसले, अविनाश साळवे, नगरसेविका श्वेता चव्हाण, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ विभागप्रमुख सोमनाथ खांदवे, आनंद गोयल, शंकर चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर ठाकरे म्हणाले, “मतदान हे शस्त्र असून देशाची लोकशाही अबाधित राखण्यासाठी प्रत्येक नागरिकांने मतदान करणे आवश्यक आहे.
यासाठी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना आघाडी करणार, की स्वतंत्र लढणार या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, “निवडणुकांना अजून अवकाश आहे. पण, याचा निर्णय पक्षातील महत्त्वाचे नेते घेतील. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांचा आकडा यंदा तरी दोन आकडी असणार का, यावर त्यांनी आताच त्याचे विश्लेषण करायची गरज नाही,’ असे सांगितले.