राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष गारटकर यांचा दावा
पुणे – जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होता. सोमवारी 55 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये जिल्ह्यातील 46 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित पॅनेलची सत्ता आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला आहे.
शिंदे -फडणवीस सरकारने सरपंच पदाची निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या निवडणुकीमध्ये सरपंचपद हे थेट जनतेमधून निवडण्यात आले आहे. जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींमध्ये जुन्नर-36, आंबेगाव-18, खेड-5 आणि भोर तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या दाव्यानुसार जिल्ह्यात 46 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. तर भाजपची चार आणि शिवसेनेची 11 ग्रामपंचायतींवर सत्ता आली आहे. जुन्नर तालुक्यात 36 ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसने 26 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. भाजपच्या 4 आणि शिवसेनेच्या सहा ग्रामपंचायतींवर सत्ता आली आहे.
आंबेगावमध्ये 16 ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 14 आणि इतर पक्षांच्या ताब्यात 4 ग्रामपंचायत, खेडमध्ये पाच पैकी राष्ट्रवादी 4 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आणि इतर पक्षांकडे एक तर भोर तालुक्यात दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व मिळविल्याचा दावा गारटकर यांनी केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील हवेली, मावळ, वेल्हा, दौंड, इंदापूर, बारामती, शिरुर, मुळशी आणि पुरंदर तालुक्यातील एकाही ग्रामपंचयातींची निवडणूक प्रक्रिया आयोजित नव्हती.