पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शनिवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत “एमपीएससी’ आंदोलनाचे पडसाद उमटले. विद्यापीठाने दि. 15 मार्च रोजी होणारी परीक्षा 11 एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एकदा परीक्षा पुढे ढकलली आहे. मात्र, एमपीएससी आंदोलनाचा उद्रेक पाहता आता विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलले चालणार नाही. त्यामुळे परीक्षा वेळेत होतील, असा चंग विद्यापीठाने बांधला आहे.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक आज झाली. विशेषत: परीक्षेसंदर्भात बोलाविण्यात आलेल्या या बैठकीत विद्यापीठाची कंपनी असलेल्या “एसपीपीयु इज्युटेक फाउंडेशन’ने विद्यार्थ्यांची परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे, याचे सादरीकरण केले. ही कंपनी विद्यापीठाची असली तरी ती सक्षम आहे का नाही, याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर याच कंपनीला परीक्षेचे काम देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी एमपीएससी परीक्षा स्थगित केल्याच्या निर्णयावरून मोठे आंदोलन पुण्यासह राज्यभरात केले होते. उमेदवारांचा प्रचंड रोष पाहावयास मिळाला. तीच स्थिती विद्यापीठांवर येता कामा नये, याचीच चर्चा बैठकीत रंगली. यापूर्वी सहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाने 15 मार्चपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र एजन्सीच निश्चित नसल्याने ही परीक्षा 11 एप्रिलपासून घेण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला.
तथापि, परीक्षा एक महिन्यांवर असतानाही परीक्षेचे काम करणाऱ्या कंपनीला परीक्षा घेण्याबाबतचे अधिकृत पत्र विद्यापीठाने दिले नाही. त्यामुळे परीक्षेचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच प्रश्नसंच तयार करण्यासाठी काही प्राध्यापकांकडून प्रतिसाद मिळत नाही. अशा परिस्थितीत ही परीक्षा वेळेत होतील, याविषयी सांशकता आहे. मात्र एमपीएससी आंदोलनाची तीव्रता पाहता परीक्षा यापुढे ढकलणे चालणार नाही. त्यामुळे परीक्षा वेळेत घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने तयारीला लागा, असा दृढनिश्चय विद्यापीठाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.