पुणे – करोना पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद आहेत. यामुळे यंदाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीत घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत घेण्यात येते. यंदा ती लांबणीवर टाकली असून ती 25 एप्रिल रोजी घेण्याचे नियोजन आहे.
मागिल वर्षी झालेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील 48 हजार 400 शाळांनी नोंदणी केली होती. त्यातून 5 लाख 74 हजार 581 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. आठवीसाठी 25 हजार 335 शाळांनी नोंदणी केली होती. त्यातील 3 लाख 97 हजार 523 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. एकूण 9 लाख 72 हजार 104 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.
यंदा शाळा बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे अर्ज भरले जाण्याची शक्यता कमी आहे. मागील वर्षी झालेल्या परीक्षेच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत यंदा निम्म्यापेक्षाही कमी नोंदणी होईल. विद्यार्थ्यांची नोंदणी वाढावी यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणेही शक्य नाही. अधिकाऱ्यांना बैठकांचे सत्रही ऑनलाइन घ्यावे लागणार आहे. शिष्यवृत्तीची परीक्षा ही ऑफलाइन होणार आहे. ती ऑनलाइन घेता येऊ शकत नाही. विद्यार्थी संख्या घटल्यास परीक्षा परिषदेच्या गल्ल्यातही मोठी घट होणार आहे.
शाळा, विद्यार्थी नोंदणीची माहितीच मिळेना
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेबाबत 9 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी 21 मार्चपर्यंत मुदत आहे. परीक्षा घेण्याच्या कामाचा ठेका “विनर सॉफ्टवेअर’ या कंपनीला दिला आहे. या कंपनीकडून काम करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठी कसरतच करावी लागते. परीक्षेसाठी किती शाळांची व विद्यार्थ्यांची आतापर्यंत नोंदणी झाली याचे अपडेट समजावेत यासाठी संबंधीत कंपनीकडून वेबसाइटवर डॅशबोर्ड अद्याप तयार केलेला नाही. काही अधिकारी, तर परीक्षेबाबत अनभिज्ञच आहेत.