पुणे- काही महिन्यांवरच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्धार केलेली कॉंग्रेस “बॅकफुट’वर आली आहे. या निवडणुका आम्ही महाविकास आघाडीतच राहून लढणार असे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी पुण्यात दिले.
महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये दोन सदस्यीय प्रभागरचनेची मागणी केली असतानाही शिवसेनेने तीन सदस्यीय प्रभागरचनेला मंजुरी देत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी केल्याचे आणि कॉंग्रेसला भूमिका बदलण्यास भाग पाडल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी पक्षवाढीसाठी राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे नुकतेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी घोषणा सर्व प्रथम केली होती.
त्यानंतर कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनीही आता स्वबळावर लढावे लागेल, असेच सगळीकडे बोलायला सुरूवात केली होती. आता स्वबळाचा नारा देणारी कॉंग्रेस स्वत:च्याच घोषणेपासून “बॅकफुट’वर आली आहे. त्याचे समर्थन करताना थोरात म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकही तिघांनी एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे.
प्रभाग रचनेवरून मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाले, असे म्हणता येणार नाही. शेवटी एकमताने तीन सदस्यांचा प्रभाग ठरलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री