नवी दिल्ली : गेल्या तीन आठवड्यांपासून पंजाबमध्ये सुरू राजकारण काही केल्या संपता संपत नाही. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी १८ सप्टेंबर रोजी पदाचा राजीनामा दिल्यापासून या वादाला सुरूवात झाली. दरम्यान, काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरिष रावत यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर उलट टिप्पणी केल्यामुळे अमरिंदर सिंग यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मनातली खदखद बोलून दाखवली आहे.
हरीश रावत यांनी केलेल्या विधानामुळे अमरिंदर सिंग चांगलेच भडकले आहेत. “माझा झालेला अपमान आख्ख्या जगाने पाहिला आहे. तरी देखील हरीश रावत उलट दावे करत आहेत. हा जर अपमान नव्हता, तर काय होतं?” असा सवाल कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला आहे.
“जर माझा अपमान करण्याचा किंवा मला वाईट वागणूक देण्याचा पक्षाचा हेतू नव्हता, तर मग कित्येक महिने नवजोत सिंग सिद्धूला माझ्यावर खुलेपणाने सोशल मीडिया आणि इतर सार्वजनिक ठिकाणी टीका करण्याची मोकळीक का देण्यात आली? सिद्धूच्या नेतृत्वाखालील बंडखोरांना माझ्या अथॉरिटीला कमी लेखण्याची मोकळीक का देण्यात आली?” असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरिश रावत यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया देताना अमरिंदर सिंग यांच्यावर कुठलातरी दबाव असल्याचे म्हटले होते. “काँग्रेसकडून अमरिंदर सिंग यांचा अपमान झाल्याच्या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नाही. अमरिंदर सिंग यांनी नुकत्याच केलेल्या काही विधानांवरून तसं जाणवत आहे. त्यांनी या सगळ्याचा पुनर्विचार करायला हवा आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या भाजपाला मदत होईल, असे काहीही करू नये”, असं हरीश रावत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी आंदोलनावर चर्चा झाली असून तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आपण पंतप्रधानांना केल्याची माहिती चरणजीत सिंग चन्नी यांनी दिली आहे.