पुणे –‘टीईटी’ घोटाळ्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अटकेचे सत्र सुरूच आहे. राज्यभर हा घोटाळा गाजत असून अर्थसंकल्पीय अधिवेशनातही यावर प्रश्न उपस्थित करून चर्चा झाली. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागाला लागलेली “कीडच’ आहे, असे बोलले जात आहे. या घोटाळ्याचा परीक्षा परिषदेच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.
राज्य परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था असून याचाच अनेकांनी गैरफायदा घेतला. यामुळेच “टीईटी’ घोटाळा घडला. “टीईटी’च्या निकालात फेरफार करून अनुत्तीर्ण उमेदवारांना उत्तीर्ण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
तपासात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत आहेत. त्यामुळे आणखी काही मोठे “मासे’ पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
“टीईटी’ घोटाळ्याप्रकरणी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, जी.ए.सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक अश्विन कुमार, डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक सौरभ त्रिपाठी, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, शालेय शिक्षण विभागातील तत्कालीन “आयएएस’ उपसचिव सुशील खोडवेकर आदींसह काही कर्मचारी, एजंट यांना अटक झाली. अद्याप कोणाचीही जामिनावर सुटका झालेली नाही. पोलिसांकडून “ओएमआर’ शीटची तपासणी करण्यात आली असून त्यातूनही निकालातील भानगडी समोर आल्या आहे.
- ‘टीईटी’ घोटाळ्याचे विपरीत परिणाम
- शिक्षकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार
- शिष्यवृत्ती परीक्षा रखडली
- टायपिंग परीक्षेला निकाल लांबला
- परीक्षा घेण्यासाठी नव्या कंपन्यांची शोधाशोध
- “टीईटी’ची प्रमाणपत्रे पडताळणीविना धुळखात
- अशासकीय सदस्यांच्या नियुक्तांचा विसर पडलाय
- नवी प्रशासकीय इमारत उभारण्याची चर्चा थांबली
- अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये निरुत्साह
- टायपिंग परीक्षा पुढे ढकलल्या