पुणे – शहरी मतदारांची मतदानातील उदासीनता दूर करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवा मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने यावर्षीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान नोंदणी झालेल्या नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, मतदार हा आपला लोकशाहीचा कणा आहे. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे. त्यामुळे आपल्याला मूलभूत हक्क मिळाले आहेत. हे अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाचा लोकशाही प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मतदार दिनाचा कार्यक्रम महत्वाचा आहे. येणारे वर्ष हे निवडणूक वर्ष असल्यामुळे या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाला अधिकच महत्त्व आहे.
मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेचे कौतुक
निवडणूक प्रक्रिया राबविण्याएवढेच चांगली, शुद्ध मतदार यादी तयार करणेही महत्वाचे आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकालही योग्य ठरतो. जिल्ह्यात कोविड काळानंतर मतदार यादी शुद्ध करण्यासाठी गेल्या तीन वर्षांत खूप चांगले झाले आहेत. गेल्या तीस वर्षांत निवडणूक प्रकियेत तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असून 7 ते 8 लाखांपेक्षा जास्त मयत, कायम स्थलांतरित, दुबार मतदारांची वगळणी यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.