महादेव जाधव
कोंढवा – कोंढवा-कात्रज रस्त्यावर गुरूवारी (दि.10) झालेल्या अपघातानंतर महापालिका प्रशासनाचे अधिकारी खडबडून जागे झाले असले तरी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करताना अपघातस्थळी मुरुम टाकला आहे. संपूर्ण रस्त्यावर अशाच पद्धतीने तकलादू काम करण्यात आले आहे. या मुरुमातील खडी रस्त्यावर पसरली असून यावरून वाहने घसरण्याचा धोका आहे. या रस्त्यावर भीषण अपघात होत असताना डांबरीकरण करून खड्डे बुजविण्याऐवजी प्रशासन मुरुमावर खर्च करीत आहे.
आणखी किती अपघात घडल्यानंतर पालिका या रस्त्याचे काम गांभीर्याने करणार? असा संतप्त सवाल या भागातील स्थानिक नागरिक करीत आहेत. पुणे महापालिका प्रशासन तसेच राजकीय लोकप्रतिनिधी यांच्या इच्छाशक्ती अभावी कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम रेंगाळले आहे. याच रस्त्याकडेला मोठ-मोठी फ्लेक्सबाजी करणारी नेते मंडळी कालच्या अपघातानंतर या रस्त्यावर साधी फिरकलीही नाही की कोणी आयुक्तांना निवेदन दिले नाही. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर मात्र सर्वच पुढारी मंडळी याचे श्रेय घेण्यासाठी “रस्त्यावर’ येतील. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम रेंगाळण्यात ज्या प्रमाणे महापालिका अधिकारी जबाबदार आहेत त्याच प्रमाणे या परिसातील सर्वच पक्षांतील नेते मंडळी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
या रस्त्याच्या कामाबाबत अनेकदा आंदोलने केली आहे. हा विषयी राज्य शासनापर्यंत पोहचविला आहे. परंतु, महापालिकेकडून याबाबत दिंरगाई करण्यात आली आहे. यामध्ये काही प्रशासकीय कारणे असले तरी त्यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेणे, भूसंपादनासाठी प्रयत्न करणे यासाठी प्रयत्न झाले नाहीत. आयुक्तांची भेट घेऊन तातडीने काम सुरू करण्याबाबत विनंती करणार आहे. अन्यथा उग्र आंदोलनाची तयारी केली आहे. – जालिंदर कामठे, अध्यक्ष, भाजपा पश्चिम महाराष्ट्र
रस्त्याची अशी आहे दुरवस्था…
- चेंबरची झाकणे दबलेली
- अनेक ठिकाणी रस्ता अरुंद
- तीव्र चढ-उताराची ठिकाण
- रात्रीऐवजी दिवसभर अवजड वाहतूक
“रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व रुंदीकरणाचे रेंगाळलेले काम वेगाने सुरू करावे यासाठी पालिका प्रशासनास वारंवार पत्रव्यवहार, निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटून प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलने, मोर्चे काढूनही प्रशासनास जाग येत नाही, रुंदीकरण करायचे तेव्हा करा परंतु, सध्या रस्त्याची पूर्ण डांबरीकरण करून अपघात सत्र थांबवावे.” – संगीता ठोसर, माजी नगरसेविका (शिवसेना ठाकरे गट)
तीव्र उतार…
खडीमशिन पोलीस चौकीपासून तीव्र उतार असून कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड चिखल, सलग नसलेले रस्ता दुभाजक, पावसामुळे पडलेले खड्डे, रस्त्यावर पसरलेली खडी, असखल रस्ता आणि मोठ्या प्रमाणावर होणारी अवजड वाहनांची वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत आहे.
कडा उखडल्या…
कात्रज-कोंढवा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत या संपूर्ण रस्त्याच्या कडा उखडल्या आहेत. पाठीमागून वाहन आल्यास दुचाकी बाजुला घेतली असता कड्यावरून घसरून दुचकीस्वरांचे अपघात होत आहे. त्यातच खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली खडी रस्त्यावर पसरल्याने यावरून वाहनेही ब्रेक लावल्यास घसरत आहेत.