पुणे- आणखी तीन महिने तरी करोनाची चौथी लाट येणार नाही, असा दावा “इंडियन मेडिकल कौन्सिल’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केला आहे. असे असले तरी मास्क वापरणे बंद करू नका, गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापराच, असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला.
राज्याने दोन एप्रिलपासून करोनाचे निर्बंध हटवले आहेत. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक नियम, मास्क सक्ती काढली आहे. परंतु, मास्क वापरू नका असे सांगितलेले नाही. करोनाची तिसरी लाट आपल्याकडे 25 नोव्हेंबर 2021 ला आली. पुढे ती 15 फेब्रुवारीपर्यंत वाढत होती. त्यानंतर ती कमी झाली. आता ती कमी झाली आहे. त्यामुळे करोना नियंत्रणात आल्याची खात्री पटली म्हणूनच राज्य सरकारने निर्बंध हटवले आहेत. करोनाची भीती अजूनही आहे. परंतु, पुढची लाट आता येण्याची शक्यता नाही, असा दावा डॉ. भोंडवे यांनी केला आहे.
चीन, हॉंगकॉंग, युरोपातील अनेक देशांत, अमेरिका येथे करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याकडे ते वाढतील अशी भीती अनेकांना वाटत आहे. याठिकाणी जो विषाणू वाढत आहे; तो ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट आहे जो “बीए-2′ आहे. 25 नोव्हेंबर 2021 पासून जी लाट आली. त्यात आपल्याकडे “बीए-1′ हा सबव्हेरियंट होता. 15 जानेवारीपासून “बीए-2 हा व्हेरियंट होता. तो आपल्याकडे येऊन गेला आहे. लोकांना त्याची बाधा होऊन गेली आहे. दुसरा कोणताही व्हेरियंट जो काळजी निर्माण करणारा असेल तो येणार नाही, असे डॉ. भोंडवे म्हणतात.
सगळे निर्बंध उठवल्याने तुम्ही सण, समारंभ साजरे करू शकता. लोकल, विमान प्रवास, बस प्रवास विनानिर्बंध करू शकता असे सरकारचे म्हणणे आहे. असे असले तरी करोना “संपला नाही’ तर “कमी झाला’ आहे. निर्बंध उठवले असले, सक्ती केली नसली तरी नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी मास्क वापरावा, असा सल्ला देऊन, विनाकारण कशासाठी संकट ओढून घ्यायचे, असा प्रश्न डॉ. भोंडवे यांनी उपस्थित केला.