पुणे, दि. 15 -शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यांपैकी एक असलेले टेमघर धरण दुरुस्तीचे काम मागील दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. शासनाकडून दुरुस्तीच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने धरण दुरुस्तीचे काम सुरु होऊ शकले नसल्याची माहिती समोर आली आहे.
टेमघर धरण बांधण्याचे काम 2001 मध्ये पूर्ण झाले. यानंतर अवघ्या 15 वर्षांतच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली. यानंतर धरण दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. पाणीसाठा असताना दुरुस्ती शक्य नसल्याने धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येते. त्यानंतरच दुरुस्ती केली जाते. दरम्यान, ही दुरुस्तीचे काम 2017 मध्ये हाती घेण्यात आले. या कामांमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ड्रिलिंग व ग्राऊटिंग या पद्धतीने धरणाबाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये 90 अंशांच्या कोनात ड्रीलच्या सहाय्याने छिद्र पाडण्यात आले. यामध्ये सिमेंट, सीलिका, फ्लॅशसोबतच दोन द्रव पदार्थ अशा सहा पदार्थांचे मिश्रण प्रेशरच्या सहायाने सोडले जाते.
या कामामुळे धरणातून होणारी गळती रोखण्यास यश मिळाले. धरण दुरुस्तीचे हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यात धरणाच्या आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरणाचे काम अर्धवट अवस्थेतच राहिले आहे. करोनाची दोन वर्षे आणि त्यानंतर धरणाच्या दुरुस्तीस जलसंपदा विभागाची सुधारीत प्रकल्प मान्यता न मिळाल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही. टेमघर धरणाची उंची 86 मीटर, तर लांबी 1075 मीटर आहे. एवढ्या भागाचे सिमेंट आच्छादीकरण होणार आहे.