पुणे –कॉंग्रेस पक्षाने 50 वर्षांत काय केले, हे सांगण्याची उठाठेव करण्यापेक्षा भाजपने गेल्या पाच वर्षांत पुणेकरांना काय दिले याचे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी द्यावे, असा सवाल माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी विचारला आहे.
कॉंग्रेसची 50 वर्षे आणि भाजपची 5 वर्षे असे सूत्र प्रचारात मांडणार आहोत, असे पाटील म्हणाले. कॉंग्रेस पक्षाने पुण्यासाठी खूप कामे केली आणि पुणेकरांना त्याची माहिती आहे. कॉंग्रेसचा आढावा घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा भाजपने पाच वर्षांत काय दिले हे त्यांनी सांगावे असे जोशी म्हणाले. ज्या पुणेकरांनी भाजपचे खासदार, आठ आमदार आणि 100 नगरसेवक निवडून दिले, त्या पुणेकरांसाठी भाजपने परतफेड काय केली? एकही मोठा प्रकल्प भाजपला कार्यान्वित करता आला नाही. नदी सुधारणा प्रकल्पाला विलंब लागला, जायका प्रकल्प महागला, स्मार्ट सिटी योजना फसली, पाच वर्षे भाजपने अपयशी कारभार केला. शहरातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे, अशी टीका जोशी यांनी केली.