पुणे – दरवर्षी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर पाचशें कोटींचा खर्च करूनही महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावत असून प्रत्येक वर्षी विद्यार्थी पटसंख्याही घटत आहे. त्यामुळे, मुलां सोबतच आता, महापालिका शाळांच्या शिक्षकांच्या अध्यपन पध्दत तसेच दैनंदिन कामकाजाचे मुल्यमापन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून आता सर्व शिक्षकांना प्रत्येक महिन्याच्या अखेरीस कार्य अहवाल सादर करावा लागणार आहे.
यात, महिन्यभरात काय शिकविले, कोणते अभिनव उपक्रम राबविले, त्याचा फायदा काय झाला, मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत काय बदल झाले याची माहिती प्रत्येक शिक्षकाला द्यावी लागणार आहे. पालिकेच्या सुमारे 287 शाळा असून यात सुमारे 97 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून जवळपास दिड हजारच्या सुमारास शिक्षक कार्यरत आहेत.
पहिल्यांदाच होणार मूल्यमापन
शाळांमधील मुलांना साधे वाचनही जमत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. तसेच पालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गळतीचे प्रमाणही अधिक आहे. गुणवत्ता वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असली तरी शिक्षकांकडून ते केले जात नसल्याचे चित्र आहे.
“महापालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत आहेत. त्याचाच, एक भाग म्हणून शिक्षकांना प्रत्येक महिन्यास मुल्यमापन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.”- विक्रम कुमार, महापालिका आयुक्त