वडगाव मावळ – पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर बोगद्याचे काम सुरू असून, याठिकाणी बोगद्याच्या कामासाठी प्रशासनाकडून रॉयल्टीची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी बोगदाच्या खोदकामातून निघालेला हजारो ब्रासचा दगड बेकायदेशीररित्या विनापरवाना वाहतूक केली जात असून प्रशासनाने याकडे काना डोळा केला आहे.
महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामासाठी कंत्राटदाराने चलन भरले असून अद्याप वाहतूक परवाना घेतलेला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. असे असले तरी येथील बोरिंग मशीनमधून निघालेल्या दगडांची हे राजरोसपणे मोठ्या डंपरमधून वाहतूक केली जात आहे. या कामानजीक असणाऱ्या लोणावळा शहरात व लगतच्या परिसरामध्ये असणाऱ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर या दगडांच्या माध्यमातून भराव करण्यात आलेला आहे. या बेकायदेशीर वाहतुकीमुळे कुरवंडे गावातील रस्ते खराब झाले आहे. यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत.
या सर्व प्रकारांमध्ये शासनाची कोट्यावधीची लूट केली जात असून प्रशासनाला हाताशी धरून काहीही करण्याची जणू काय मावळात चालच सुरू आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच कार्यालयात आपला जम बसवत असून गरिबांना कोणीही वाली मिळत नाही. प्रशासन बदलल्यानंतरही या ठिकाणी कुठल्याही बदल्या होत नाही साहेबांची व राजकीय मंडळींची मर्जी राखत या ठिकाणी सर्व कारभार चालू आहे. आतापर्यंत मिसिंग लिंकमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आहे. कुरवंडे गावामध्ये दगडांचे मोठे ढीग लागले असून, हे केवळ नागरिकांना दाखविण्यासाठी तर केले नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत येथील नागरिकांना या संदर्भात विचारणा केली असता, दररोज रात्री या ठिकाणाहून दगडाने भरलेले डंपर जातात. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. याकडे स्थानिक पुढारी देखील लक्ष देत नसल्याची खंत नागरिकांनी यांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांमधून अनेक प्रश्न उपस्थित
हजारो ब्रास दगडाची वाहतूक अद्याप एकाही गाडीवर कारवाई का नाही?
क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करून रस्त्याची झाली चाळण तरी प्रशासनाला लक्षात का येत नाही? अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाहतूक करून आणलेल्या दगडाने भराई केली. भ्रष्ट प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिला नाही का?असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.
माहिती घेऊन सांगतो: तहसीलदार
याप्रकरणी तहसीलदार विक्रम देशमुख यांना विचारणा केली असता या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करतो असे सांगितले तरीही अद्याप त्यांच्याकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. तर हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत तहसीलदार देशमुख यांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.