पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक भरतीसाठी येत्या फेब्रुवारीमध्ये अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने पारदर्शकपणे शिक्षकभरती करण्यासाठी पवित्र पोर्टल प्रणाली विकसित केली आहे. शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी “टीईटी’ व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. महाआयटी मार्फत पहिली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा डिसेंबर 2017 मध्ये घेण्यात आली होती.
या परीक्षेला 1 लाख 90 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. राज्य शासनाचे अवर सचिव प्रवीण मुंढे यांनी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्याबाबत संबंधित यंत्रणाचा समन्वय साधून नियोजन करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना बजाविले आहेत.