फुरसुंगी – गेल्या सहा वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या उरुळी देवाची व फुरसुंगी या गावांमधे रस्ते, पाणी, कचरा निर्मूलन, आरोग्य व अन्य मुलभूत सुविधा न देता पालिका प्रशासन फक्त टॅक्सच गोळा करत आहे. त्यामुळे टॅक्स माफी करा आणि पाणी प्रश्न सोडवा, अशी मागणी करत हवेली तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
यावेळी ग्रामस्थांसमवेत सासवड मार्गावर मंतरवाडी चौकात जनआक्रोश रास्ता रोको मनपाविरोधात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हवेली तालुकाध्यक्ष व उरुळी देवाची गावचे माजी उपसरपंच प्रशांत भाडळे यांनी वारंवार मुलभूत सुविधा देण्याची मागणी करुनही पालिकेने दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले.
समाविष्ट गावांचा पाणी-टॅक्स आणि नागरी सुविधांचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामाध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक गणेश ढोरे, माजी तालुकाध्यक्ष राहुल चोरघडे, माजी सरपंच उत्तम गायकवाड, तात्यासाहेब भाडळे, युवक अध्यक्ष प्रजीत हरपळे, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष प्राची देशमुख, माजी सरपंच नीता भाडळे, चंद्रकांत ढमाळ, सोमनाथ यादव, अशोक न्हावले, दास काका, महेंद्र चौरे, उरुळी अध्यक्ष अंजली भाडळे, दीपाली गायकवाड, सुवर्णा झांबरे, नवनाथ निगडे यांच्यासह आदर्शनगर, स्वामीराज पार्क, प्रणव पार्क रहिवासी, उरुळी देवाची ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पाणीपुरवठा विभाग सहायक अभियंता विक्रम लहाने आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी हडपसर-लोणी काळभोर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
“कोणतीही सुविधा मिळत नसल्याने नागरिक मनपाचा भरमसाठ टॅक्स भरणार नाहीत. आधी सुविधा द्या. पाणी द्या. टॅक्समध्ये ४० टक्के सवलत द्या अन्यथा मोर्चा काढून महानगरपालिकेचे कामकाज बंद पाडू.” – प्रशांत भाडळे, हवेली तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस