पुणे- महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये 658 कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये अनियमिता झाल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्या 16 ग्रामसेवक आणि 2 कृषी विस्तार अधिकारी असे एकूण 18 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून त्यांची विभागीय खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे, अशी महिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेमध्ये दिली. तसेच जिल्हा परिषदेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस राज्य शासनाकडे केली असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
विधानसभेमध्ये याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. ग्रामपंचायत जांभुळवाडी-कोळेवाडी येथे बनावट भरती प्रक्रिया झाले आहे. मात्र, या ग्रामपंचायत पालिकेमध्ये समाविष्ट झाल्याने दि. 12 फेब्रुवारी 2022 रोजी भरतीमध्ये उमेदवारांकडून रक्कम वसुलीची बाब जिल्हा परिषदेच्या अद्यापही निदर्शनास आलेली नाही. ज्या ग्रामपंचायतींमध्ये नोकरभरीमध्ये अनियमितता झालेली आहे. त्या गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची विभागीय स्तरावर चौकशी सुरू केली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.