पुणे- इयत्ता बारावी व दहावी परीक्षेसाठी केंद्रावर विलंबाने येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
उत्तरपत्रिका लेखन प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, अपावादात्मक परिस्थितीत दहा मिनिटे उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यांच्या विलबांच्या कारणाची खातरजमा करून केंद्रसंचालक स्तरावर परवानगी देण्यात येत होती. मात्र, या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेला प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी लेखी परीक्षेस प्रविष्ठ होऊ देण्याची सवलत 16 मार्चपासून बंद केली आहे, असे राज्य
मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.
सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर हजर राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाटप करणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात सकाळी 10.20 वाजेपर्यंत तर दुपारच्या सत्रात 2.50 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात हजर राहणे बंधनकारक आहे.