पुणे – उन्हाच्या वाढत्या झळांमुळे राज्यामध्ये विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये मंगळवारी (दि. 15) महावितरणने मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात आजवरच्या सर्वाधिक मागणीनुसार वीजपुरवठ्याचा महाविक्रम नोंदविला व मागणीप्रमाणे तब्बल 23 हजार 605 मेगावॅट विजेचा सुरळीत व अखंडित वीजपुरवठा केला. दरम्यान, मुंबईसह राज्यात या दिवशी 27 हजार 212 मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली.
उल्लेखनीय म्हणजे गेल्या महिन्याभरात विजेच्या उच्चांकी मागणीचे इतिहास घडले आहे. या आधी दि.19 फेब्रुवारीला महावितरणकडून सर्वाधिक उच्चांकी 23 हजार 286 मेगावॅट विजेचा मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आला होता. त्याआधी दि. 8 फेब्रुवारीला 23 हजार 75, तर दि. 12 फेब्रुवारीला 23 हजार 163 मेगावॅटचा मागणीप्रमाणे विक्रमी वीजपुरवठा करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत देखील सातत्याने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत महावितरणच्या कार्यक्षेत्रामध्ये विजेची मागणी 23 ते 23 हजार 500 मेगावॅटदरम्यान स्थिरावली आहे.
मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीला वेग
तापमानात वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांमध्ये ही 24 हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत विजेची विक्रमी मागणी पूर्ण करताना राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आलेले नाही व तशी गरज भासणार नाही याबाबत काळजी घेतली जात आहे. त्यासाठी सध्या महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तींच्या कामांना वेग देण्यात आला आहे.