पुणे – अनेक वर्षांची मागणी असलेल्या मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. रिद्धपूर जि. अमरावती येथे आगामी शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सोबतच पुण्यासह राज्यात दहा ठिकाणी त्याचे उपकेंद्र स्थापन केले जाणार आहे.
मराठी भाषा मराठी साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच मराठी भाषा आणि तिचा गौरव वाढवणारे हे पहिले मराठी भाषा विद्यापीठ असेल. मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती या नावाने ते ओळखले जाईल. ज्येष्ठ संशोधक व साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या विद्यापीठाच्या स्थापनेबाबत राज्यभरातील मराठी भाषा, संस्कृतीबाबत सखोल अभ्यास करून त्याचा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाला सादर केला होता. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ स्थापनेची घोषणा विधानसभेत केली. यासाठी पहिल्या टप्प्यात २२ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चास नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
रिद्धपूर येथेच का होणार स्थापना?
मराठी भाषेत गद्य, चरित्र, व्याकरण, कोशग्रंथ यांसोबतच काव्यग्रंथाचेही लेखन महानुभव पंथातील साहित्यिकांनीच सर्वप्रथम केले. मराठी भाषेतील पहिला गद्य व चरित्रग्रंथ ‘लीळाचरित्र’चे संकलन पंडित म्हाइंभट यांनी केल्यावर रिद्धपूर येथेच बाराव्या शतकात संपादन कार्य पूर्णत्वास गेले.
मराठी साहित्यविश्वाला समृद्ध करणाऱ्या आणि संस्कृतऐवजी लोकभाषा मराठीतून साहित्यनिर्मिती करणाऱ्या महानुभवांची साहित्यसंपदा अजूनही उजेडात आली नाही. त्यामुळेच मराठी विद्यापीठाची गत ३० वर्षांपासून मागणी आहे. मराठी विद्यापीठाची रिद्धपूर येथे स्थापना झाल्यास अनेक हस्तलिखिते व सांकेतिक लिपी नव्याने जगासमोर येतील. त्यामुळे रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती.
असे असेल पहिले मराठी विद्यापीठ
- रिद्धपूर येथे एमटीडीसीच्या इमारतींमध्ये तात्पुरत्या स्वरुपात सुरू होणार.
- मुंबई, पुणे, पंढरपूर, धुळे, नाशिक, अंबाजोगाई, नांदेड, औंध, गडचिरोली, सावंतवाडी अशी दहा प्रादेशिक उपकेंद्रे
- पहिल्या टप्प्यात एकूण २४२ पदांची निर्मिती
- या विद्याशाखांचे मिळणार शिक्षण
- या विद्यापीठात भाषा व लिपी विज्ञान, भाषा शिक्षण, भाषांतर विद्या व तौलनिक साहित्य अभ्यास, सर्जनशील साहित्य निर्मिती, व्यावसायीक मराठी विद्याशाखा, आंतरज्ञानशाखीय साहित्यभ्यास, महाराष्ट्र विद्याभ्यास शाखा, संस्कृती, कला, सामाजिक शास्त्रे, वृत्तपत्रविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन अशा विद्या शाखा असतील
- प्रमुख उद्दिष्ट
- मराठीच्या सर्व बोलीभाषांचे संवर्धन, देश-विदेशांतील विद्यापीठे आणि संस्था यांच्या सहकार्याने भाषा संवर्धनाचे उपक्रम व देशातील मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन व संवर्धनाचे प्रमुख उद्दिष्ट या विद्यापीठ स्थापनेमागे ठेवण्यात आले आहे.