नवजात बाळांची श्रवण क्षमता वेळीच तपासणे आवश्यक
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात असावी तपासणी, उपचार यंत्रणा
पुणे – बाळाच्या आगमनाने घर आनंदाने फुलते. मात्र, काही वेळा बाळाशी बोलल्यावर ते प्रतिसाद देत नाही. त्यावर त्याला ऐकू येत नाही हे समजताच घर शांत होते. त्यामुळे जन्मताच त्या बाळाच्या “ऑटो ऑक्टोस्टोम इमिशन्स’ आणि “बेरा’ अर्थात ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऍडिमेट्री या दोन तपासण्या होणे आवश्यक आहे, असा सल्ला कान, नाक, घसा तज्ज्ञांनी दिला आहे.
एक हजार मुलांमागे तीन ते चार मुलांना जन्मजात बहिरेपणा असण्याची शक्यता आहे. त्यासाठी बाळ जन्मल्यानंतर वैद्यकीय तपासण्या आवश्यक आहेत, असे ज्येष्ठ कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी सांगितले.
मात्र, बहुतांशवेळा या तपासण्या केल्या जात नाही. तर पालकही याबाबत फारसे जागृत नसतात. बाळ सहा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्याचे झाल्यानंतर ते बोलण्याला प्रतिसाद देत नाही, हे लक्षात आल्यावर पालकांची धावपळ होते.
तर ग्रामीण भागात पालकांना हे उशिराने लक्षात येते. पालकांना उपचारांची फारशी माहिती नसल्यामुळे वेळ निघून जाते आणि बाळाला आयुष्यभर बहिरेपणा घेऊन जगावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात बेहरेपणा तपासणीचे केंद्र उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
वेळीच उपचार गरजेचे
जन्मजात मुलांचा मेंदू दोन ते तीन वर्षांत विकसित होतो. त्यादरम्यान त्याची दृष्टी, श्रवणक्षमता आणि बोलण्याची क्षमता तयार होते. या क्षमतेमध्ये काही समस्या असल्यास त्या वेळीच समजल्या, तर पुढील उपचार तत्काळ होऊ शकतात आणि मूल चांगले आयुष्य जगू शकते. मेंदू विकसित झाल्यावर उपचारात अनेक समस्या येतात, तसेच त्या मुलाला आयुष्यभर बहिरेपणा घेऊन जगावे लागते. त्यामुळे वेळीच तपासणी आणि उपचार आवश्यक आहेत.
पुण्यात केवळ ससून आणि औंध जिल्हा रुग्णालयात बहिरेपणा तपासणीची सुविधा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला तपासणीसाठी पुण्यात यावे लागते. खासगी रुग्णालयात जायचे म्हटल्यावर तपासणी आणि येण्या-जाण्याचा खर्च आठ ते दहा हजारांच्या पुढे जातो. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात तपासणी केंद्र सुरू झाले, तर पालकांची फरफट थांबेल आणि बाळाच्या आजाराचे तत्काळ निदान होईल.
– डॉ. अविनाश वाचासुंदर ज्येष्ठ कान, नाक, घसा तज्ज्ञ
जिल्हा रुग्णालयामध्ये लहान बालकांच्या कानाच्या चाचण्या केल्या जातात. जिल्ह्यातील रुग्णांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. तालुकापातळीवर अद्यापतरी शासकीय रुग्णालयात अशा चाचण्या होत नाहीत.
– नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे.