पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातून 7 लाख 9 हजार 481 विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे. आता ही परीक्षा एप्रिलपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येवू लागली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 47 हजार 388 शाळांनी नोंदणी केलेली आहे. पाचवीच्या परीक्षेसाठी 4 लाख 14 हजार 251 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. यात 4 लाख 10 हजार 281 विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया शुल्क भरुन पूर्ण झालेली आहे. 3 हजार 970 विद्यार्थ्यांची शुल्क न भरल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबितच पडले आहेत. इयत्ता आठवीच्या परीक्षेसाठी 3 लाख 2 हजार 383 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. यात 2 लाख 99 हजार 200 विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया शुल्क भरून पूर्ण झालेली आहे. 3 हजार 183 विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबितच पडले आहेत.
आधी 20 फेब्रुवारीला परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आता ही शिष्यवृत्ती परीक्षा दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतरच होण्याची अधिक शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. मागील परीक्षेसाठी 6 लाख 32 हजार एवढ्या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.