पुणे – राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील (डायट) अधिकारी, कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. यामुळे त्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे.
या आंदोलनस्थळी शिक्षण आयुक्त, विद्या प्राधिकरणाचे संचालक फिरकलेदेखील नाहीत. वेतनाचा तिढा अद्यापही कायम असल्याने अधिकारी, कर्मचारी संतापले आहेत. दरम्यान, जागतिक महिला दिनापासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
“डायट’मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून नियमित निधी मिळत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वेतनात अनियमितता निर्माण झाली आहे. शासनाकडून वेतनच रखडल्याने अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेतनासाठी कायमस्वरूपी लेखाशीर्ष निर्माण करून त्यात निधी उपलब्ध करून दिल्यानंतरच हा तिढा सुटणार आहे. शालेय शिक्षण व वित्त विभाग यांच्यात याबाबत सत्कारात्मक चर्चा झाली तरच वेतनाचा प्रश्न निकाली निघणार आहे.
प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन…
“डायट’मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 2 मार्चपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरू ठेवले आहे. 17 मार्चपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे. यानंतरही प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. “डायट’च्या नांदेड शाखेच्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने 8 मार्चपासून मुंबई येथे आमरण उपोषण आंदोलन करणार आहे. थकीत वेतन त्वरित मिळावे, 2014 पासून रखडलेल्या पदोन्नत्या द्याव्यात, दिव्यांग अधिकाऱ्यांना पदोन्नत्या मिळाव्यात, एमपीएससीकडून विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना सर्व लाभासाठी पात्र समजावे, पात्र अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, “डायट’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रदान करा, अधिव्याख्यातांचा ग्रेड पे सुधारित करून द्यावी आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.