घरची व्यावसायीक पार्श्वभूमी तसेच सासर व माहेरकडून मिळालेल्या पाठिंब्यावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अर्चना विशाल आंधळकर यांनी गृहीणी ते यशस्वी उद्योजिका असा खडतर प्रवास करीत यश मिळवून समाजात आदर्श निर्माण केला आहे. जिद्द चिकाटी, इच्छाशक्तीच्या बळावर आंधळकर यांनी समर्थ बालाजी फरसाणचा ब्रॅंड रुजविण्यात यशस्वी झाल्या आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त अर्चना विशाल आंधळकर यांच्याशी साधलेला संवाद.
अर्चना विशाल आंधळकर यांचे माहेर नगर जिल्ह्यातील. अर्चना यांचे वडिल त्र्यंबक कोरे. कोरे कुटुंबीयांना व्यावसायिक वारसा. तीन पिढ्यांचा किराणा व्यवसायातील व्यापारशीलता आहे. खर्डा (ता. जामखेड) येथे त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण. लग्नानंतर त्या श्रीगोंद्याचे सासूरवाशिण झाल्या.
व्यवसायात काही तरी करण्याची जिद्द त्यांच्यात होती. ही इच्छाशक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. लग्नानंतर देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची उमेद त्यांच्यातील आत्मविश्वासाला फुंकर घालत होती. सासरी श्रीगोंदा येथे व्यावसायिक पार्श्वभूमी आहे. 2007- 2008 मध्ये श्रीगोंदा येथे फरसाणा व्यवसायाला सुरुवात केली. पती विशाल ऑक्सिकुल कंपनीमध्ये गलेलठ्ठ पगारावर मार्केटिंग क्षेत्रात नोकरी करीत होते.केडगाव चौफुला (ता. दौंड) येथे नोकरीनिमित्ताने आंधळकर कुटुंब वास्तव्यास आले. मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची उमेद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.त्यातूनच सामाजिक, शैक्षणिक आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात देशात विकासाचा पॅटर्न म्हणून ओळख निर्माण केलेल्या बारामती शहरात 2015 सली वास्तव्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये समर्थ बालाजी फरसाना व्यवसायाला सुरुवात केली. बारामती एमआयडीसीमध्ये कटफळ रोड लगत भाडेतत्वावर जागा घेऊन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला तुटपुंज्या भांडवलावर व्यवसायाचे पायाभरणी केली.
पतीच्या नोकरीमधून बचतीच्या पैशातून सुरुवातीला दोन मशीन खरेदी केल्या. सुरुवातीला एकाच व्यक्तीला रोजगार देणे शक्य असल्याने त्यांनी केवळ एका कारागिरांवर सुरुवात केली. त्यांनी स्वतः देखील कष्ट घेतले.अर्चना आंधळकर यांनी स्वतःचा फॉर्म्युला वापरून तयार केलेल्या फरसानाण्याची चव अल्पावधीतच खवय्यांच्या जिभेवर रेंगाळू लागली. त्यामुळे प्रत्येक दिवशी दोनशे किलो फरसाना मार्केटमध्ये जाऊ लागला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला. व्यवसायाचा जम बसत असतानाच 2016 मध्ये पुन्हा त्यांच्यावर नोटबंदीचा फटका बसला. मात्र, न डगमगता त्यांनी व्यवसाय सुरूच ठेवला. गुणवत्ता असल्याने फरसान्याच्या मागणीत वाढ होत गेली. दोनशे किलोंहून प्रत्येक दिवशी 500 किलोपर्यंत मागणी वाढली. ग्राहकांना दर्जा, गुणवत्तेचे उत्पादन देताना त्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद नसल्याने मागणी असून देखील फरसाणाचा पुरवठा करणे शक्य होत नव्हते.पती नोकरी करीत असल्याने सर्व जबाबदारी अर्चना आंधळकर यांच्यावर होती.
बाजारात समर्थ बालाजी फरसाणाचा ब्रॅण्ड आणि चव सर्वतोमुखी झाली होती. व्यवसाय वाढत आहे. मात्र, मनुष्यबळ व भांडवलाचा अभाव होता. तुम्ही नोकरी न करता व्यवसायाकडे वळावे, असा सल्ला पत्नी अर्चना यांनी पती विशाल यांना दिला. पत्नीची व्यवसायाबद्दलची निष्ठा व जिद्द पाहून विशाल यांनीदेखील नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर अर्चना आंधळकर यांना विशाल यांची मदत होऊ लागली. विशाल यांचा मार्केटिंग क्षेत्रातील दहा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या कामी आला. त्यामुळे समर्थ बालाजी फरसाण याचा विस्तार चार जिल्ह्यांत होऊ शकला.
व्यवसायाचा विस्तार वाढ होत असल्याने कमी जागेत व छोट्या मशनरीच्या सहाय्याने सुरू केलेला व्यवसाय वाढविणे गरजेचे होते. त्यामुळे बारामती येथील लघु औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनी स्थापनेचा विचार अर्चना आंदळकर यांनी केला. मात्र आर्थिक भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला. एक बंद अवस्थेतील असलेल्या कंपनीची जागा भाडेतत्त्वावर घेऊन व्यवसाय विस्तार केला. जवळपास 40 ते 50 लाख रुपये भांडवल गुंतवणूक करून मोठ्या मशनरीच्या साह्याने व्यवसाय उभारणी केली. यावेळी मात्र त्यांना बॅंकेचे अर्थसहाय्य घ्यावे लागले. सध्या बारामती येथील लघु औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांचा समर्थ बालाजी फरसाण व्यवसाय बहरत आहे. पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत फरसाण तसेच जवळपास 25 हून अधिक पदार्थ विक्रीसाठी जात आहेत.. कंपनीच्या दोन मालवाहतूक गाड्या आहेत. बारा कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. दररोज दोन टन फरसाणाची बाजारातून मागणी आहे.
पती विशाल यांच्याबरोबरच इयत्ता दहावीत शिकत असलेली मुलगी समृद्धी हिने व्यवसायासाठी प्रोत्साहित केले. लहान मुलगा समर्थ याच्यामुळे मी बाहेर पडू शकत नव्हते. मात्र. समर्थ यांचा सांभाळ करण्यात समृद्धीची मोठी मदत झाली. त्यामुळे मी बाहेर पडू शकले. खऱ्या अर्थाने समृद्धीचा आईला व्यवसायात हातभार लावण्यासाठी मोठा वाटा आहे. तिने समर्थची जबाबदारी घेतली नसती तर मी बाहेरच पडू शकले नसते, असे अर्चना आंधळकर हे आवर्जुन नमूद करतात. करोनाकाळात पहिल्या लॉक डाऊनमध्ये कंपनीचे काम सुरू होते. त्यामुळे लॉकडाऊन काळातही कर्मचाऱ्यांना रोजगार देता आला. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मात्र कंपनी बंद राहिली. तरी कुठल्याही कर्मचाऱ्याला वाऱ्यावर सोडले नाही. कुटुंबातील एक घटक असल्यासारखे त्यांना मदत केली आहे. यातून आंधळकर दाम्पत्यांचे समाजभान अधोरेखित होत आहे.
गुणवत्तेशी तडजोड नाही
अर्चना आंधळकर व विशाल आंधळकर या दोघांचा फरसाणा बनवण्यासाठी लागणारा हा फॉर्म्युला आहे. चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून फरसाणा बनविला जातो. कुठल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. त्यामुळे फरसाणाची चव ग्राहकांच्या जिभेवर रेंगाळत आहे. दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील, मात्र गुणवत्तेशी तडजोड केली जात नाही. त्यामुळे ऍडव्हान्स देऊन ग्राहक फरसाना खरेदी करत असल्याचे आंधळकर पती-पत्नी सांगतात.
सासरे चंद्रकांत आंधळकर तसेच सासू हिरा आंधळकर तसेच वडील त्रिंबक कोरे व आई निर्मला कोरे यांचा आशीर्वादरुपी आधार आमच्यासोबत कायम आहे. सासुबाई देखील उत्तम सुगरण आहेत. त्यांच्या बेसन लाडूला पुणे शहरात चांगली मागणी आहे.
भाऊ प्रवीण कोरे तसेच बहीण शितल उमेश नगरे यांचादेखील आधार वाटतो. तेही मदतीसाठी तत्पर असतात. ते दोघेही व्यवसायात पारंगत आहेत. त्यामुळे व्यावसायिक पार्श्वभूमी कुटुंबाकडून मिळाली आहे.
संकलन
प्रमोद ठोंबरे, (बारामती तालुका प्रतिनिधी)