मंचर – महावितरणने असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याचे आज आंबेगाव तालुक्यात पाहायला मिळाले. तब्बल शंभरहून अधिक रुग्ण दाखल असताना केवळ वीजबिल थकीत असल्याचे कारण देत मंचर उपजिल्हा रुग्णालयाचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. 21) दुपारीखंडित करण्यात आला. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने वीजपुरवठा पूर्ववत करणे त्यांना भाग पडले. दरम्यान एक तास वीस मिनिटे वीज पुरवठा बंद असल्योन रुग्णांचा जीव मात्र टांगणीला लागला होता.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे शंभरहून अधिक रुग्ण दाखल असताना महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 52 लाख रुपये थकबाकीपोटी दुपारी एक वाजता वीज कनेक्शन तोडले. मंचर उपजिल्हा रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित केल्यामुळे आयसीयू, डायलिसिस विभाग, ऑपरेशन थिएटर, प्रसूती विभाग व हॉस्पिटलमधील इतर विभाग आणि त्यातील रुग्ण यांच्यावरील उपचार ठप्प झाले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजयकुमार भवारी यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या वीज जनित्राकडे जाऊन पाहिले असता तेथे वीज पुरवठा खंडित केल्याचे दिसून आले. डॉ. भवारी यांनी महावितरणचे सहायक अभियंता जयंत गेटमे यांच्याशी संपर्क करून वीजबिल मार्चअखेर भरणार असून वीजपुरवठा तात्काळ सुरू करा, अन्यथा रुग्णांच्या नातेवाइकांच्या जीवाला धोका होण्याची भीती व्यक्त केली. यावेळी रुग्णांच्या नातेवाइकांनी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष प्रकाश थोरात, राष्ट्रवादीचे संतोष गावडे, निळूभाऊ काळे, सुरेश निघोट, विठ्ठल तांबडे यांनी वीजमंडळाच्या चुकीच्या कारभारावर संताप व्यक्त करून निषेधाच्या घोषणा केल्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर, तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी वीजमंडळाविरोधात घातलेला गोंधळाची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख ऍड. अविनाश राहणे, खादी ग्रामोद्योगचे माजी अध्यक्ष राजू सोमवंशी, महेश घोडके, प्रा. सुरेखा निघोट, कमलभाई मणियार, सुवर्णा डोंगरे यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर वीजपुरवठा खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हणत गोंधळ घातला. वातावरण तप्त होत असल्याचे पाहिल्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष राजू इनामदार आणि मंचर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शेटे यांनी महावितरणचे सहायक अभियंता जयंत गेटमे यांना रुग्णालयात आणून तेथील वीजपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल असे सांगितले.
वळसे पाटलांची फोनवरून मध्यस्थी
राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संतोष गावडे, मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे सल्लागार समिती सदस्य डी. के. वळसे पाटील यांनी रुग्णालयाचा वीजपुरवठा थकबाकीपोटी बंद केल्याचा प्रकार तालुका लोकप्रतिनिधी आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कळविला. त्यांनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याचे सांगितले. त्यानंतर सहाय्यक अभियंता गेटमे यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देऊन सुमारे एक तास वीस मिनिटे बंद असलेला वीज पुरवठा चालू केला.
उपजिल्हा रुग्णालयाची वीज तोडल्याने मंचर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. खंडित केलेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा. वीजपुरवठा खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली होती. फडणवीस यांनीही वीज कनेक्शन ताबडतोब जोडण्यात येईल, कोणी जाणीवपूर्वक असे केले असेल तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
-दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री