जांबूत – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बुधवार (दि.०१ ) रोजी रात्री साडेनाऊ वाजण्याच्या सुमारास पूजा जालिंदर जाधव (वय २२) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने महिलेला उसाच्या शेतात ओढून नेऊन गळयाभोवतीचा भाग खात तिला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग आता किती मृत्यूची वाट पाहणार अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी सभापती देवदत्त निकम यांच्यासह शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, महेंद्र दाते यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि मयत पूजा हि टाकेवाडी – कळंब (ता.आंबेगाव) येथील रहिवाशी असून तिचे पती जालिंदर मारूती जाधव आणि चुलत दिर विश्वास बाळू जाधव यांचेसह फाकटे (ता.शिरूर) येथून कळंब – टाकेवाडी येथे रस्त्याने दुचाकीवरून प्रवास करत असताना बोंबेमळा हद्दीत लघुशंकेच्या निमित्ताने थांबले असता रस्त्याच्या कडेला तिच्यावर बिबट्याने हल्ला करून सुनिल कुऱ्हाडे या शेतकऱ्याच्या शेतात ओढून नेले. यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर जमलेल्या स्थानिकांनी शोध घेतला असता उसाच्या शेतात पूजाचा मृतदेह आढळून आला.
या भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचे वास्तव्य आहे. अशा प्रकारची मनुष्यहाणी होणे ही घटना अतिशय दुर्दैवी असून बिबट हल्ल्यात मोठ्या प्रमाणात पशुधन धोक्यात आलेले असताना या आधी देखील जांबूत परिसरात तीन जणांना बिबट हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांवर जीवघेणे हल्ले या आधीच्या काळात झालेले असल्याने दिवसाढवळ्या या परिसरात अन्न पाण्याच्या शोधात बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले आहे. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह, मजूर व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारे दिवसेंदिवस हे हल्ले वाढत असून वनविभागाने तातडीने हे बिबटे जेरबंद करावे अन्यथा अशा प्रकारचा काही प्रसंग यापुढे उद्भवल्यास वनविभागाच्या कार्यालयासमोर संबंधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करून वनविभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे यांनी दिला असून वनविभागाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी माजी सरपंच मंदा बोंबे, उपसरपंच विकास वरे, ग्रामपंचायत सदस्य बळवंत बोंबे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, संचालक नरेंद्र बोंबे, शरद बोंबे, विकास बोंबे, ओंकार कुऱ्हाडे, सतिश शेळके, प्रभू ढोमे, पोपट बोंबे, गणेश बोंबे, उमेश करंडे, वसंत बोंबे यांचेसह ग्रामस्थांनी केली आहे.