पुणे : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अटक, त्यानंतर ७२ तासांत आव्हाडांवर महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी खळबळजनक दावा केला. कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल, असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “जितेंद्र आव्हाडांवर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकारणात कधी कोण सत्तेत, तर कधी विरोधी पक्षात असतं. राजकीय द्वेषातून कधी कोणीच त्रास देऊ नये. आमचं सरकार असताना आताचे सत्ताधारी म्हणतात की काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला.”
मात्र, “गेली ३० ते ३२ वर्ष झालं काम राजकारणात काम करतो. कधी सत्ता असताना त्या त्याचा गैरवापर करून जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला नाही. कायदा, नियम आणि संविधान सर्वांना समान आहे. कायदा आणि घटनेचा विचार करून सर्वांनी पुढं गेलं पाहिजे,” असे अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले आहे.
“केंद्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल. ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत अथवा त्यानंतर काही महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. पण, ही बातमी मिळते तेव्हा आश्चर्य वाटतं,” असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले होते.