पुणे-नव्या प्रभाग रचनेत भाजपचे अनेक दिग्गज विद्यमान एकाच प्रभागात आले आहेत. त्यामुळे पक्षाची अडचण झाली आहे. त्यात आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) पुण्यात 20 जागांवर दावा केला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे आधीच अनेक प्रभागांत इच्छुकांचीच गर्दी झालेला भाजप आता रिपाइंला किती जागा सोडणार, यावरून चर्चांना सुरूवात झाली आहे.
उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पक्षाचे माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे, पक्षाचे नेते बाळासाहेब जानराव यावेळी उपस्थित होते. 2017 मध्ये भाजपने रिपाइंला शहरात 12 जागा दिल्या होत्या. त्यातील 3 उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर 5 जण निवडून आले. चौघांचा पराभव झाला होता. तर, महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपने चार वर्षे रिपाइंला उपमहापौर पद दिले आहे. 2017 मध्ये चार सदस्यांचा प्रभाग झाल्यानंतर रिपाइंने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. या युतीसाठी खासदार गिरीश बापट यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर आता रिपाइं भाजपच्या चिन्हावरच लढणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
भाजपच्या कोंडीत भर?
“2017 नंतर शहरात रिपाइंची संघटनात्मक ताकद वाढली आहे. प्रारूप प्रभाग रचना पाहता, आता पक्षाला 20 ठिकाणी अनुकूल स्थिती आहे. तसेच इतर पक्षातील काही नगरसेवकही पक्षाच्या संपर्कात असल्याने 20 जागांची मागणी केली आहे,’ असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शहरात 20 हून अधिक प्रभागांत भाजपचे चार नगरसेवक होते. त्यात, आता 3 सदस्यांचा प्रभाग असल्याने तसेच नव्या रचनेत मोठया प्रमाणात प्रभागांची तोडफोड झाल्याने भाजपच्या दिग्गजांकडून उमेदवारीवर दावाही सुरू करण्यात आला आहे. त्यातच आता रिपाइंच्या मागणीत सर्वच भागांतील प्रभाग असल्याने भाजपची कोंडी वाढण्याची राजकीय चर्चा आहे.