पुणे – येरवडा येथील डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत वरिष्ठ (पदवी) विभागातून वारजे माळवाडी येथील संस्कार मंदिर संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील रोहन कवडे या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत राज्यभरातील विविध महाविद्यालयातून स्पर्धकांनी भाग घेतला. ही स्पर्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन गटात घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पांडकर, प्रा.डॉ. गौतम बनसोडे, प्रा.जगदीश गाणार यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेसाठी आत्मनिर्भर भारत, अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजमाध्यमांच्या विळख्यात आजची तरुणाई, डॉ. आंबेडकर यांचे शैक्षणीक विचार, देशाच्या विकासात महिलांचे योगदान, जलसंवर्धन ही काळाची गरज हे विविध विषय देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी श्रीमती कलावती बधे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद धिवार, सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा गायकवाड यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेत वरिष्ठ विभागातून प्रथम क्रमांक – रोहन कवडे (संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, वारजे माळवाडी), द्वितीय क्रमांक – श्रावण कदम (सर परशुरामभाऊ महाविद्यालय), तृतीय क्रमांक – सुयश मुंढे (नौरसजी वाडिया महाविद्यालय ), उत्तेजनार्थ – शिवम जाधव (सर परशुरामभाऊ महाविद्यालय) या प्रमाणे विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविले.
कनिष्ठ विभागातून प्रथम क्रमांक – तेजस ठाकरे (सर परशुरामभाऊ महाविद्यालय) , व्दितीय क्रमांक – विद्या चव्हाण (श्रीमती कलावती बधे महाविद्यालय, कोंढवा), उत्तेजनार्थ – वेदिका वानखेडे (डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, येरवडा) यांनी या प्रमाणे क्रमांक प्राप्त केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. शिवाजी मोटेगावकर, प्रा.रमेश साळुंखे, प्रा.डॉ.श्रेयशी परब, प्रा ज्ञानदेव बनसोडे, प्रा.प्रशांत झोंबाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. ही स्पर्धा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आली होती.