हिंगोली – सेनगाव तालुक्यातील गोरेगाव अप्पर तहसील कार्यालय व गावात सार्वजनिक ठिकाणी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हरवल्याचे बॅनर झळकले. या भागातील शेतकऱ्यांनी हे बॅनर लावले आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांचा शोध घेणाऱ्यास 10 किलो सोयाबीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची ही बॅनरबाजी सध्या चर्चेत आली आहे.
दरम्यान, यंदाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यांचा लागवड खर्चही निघाला नाही. सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका या पिकांच्या नुकसानीमुळे हिंगोलीतील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले. या स्थितीतही त्यांनी उधार उसणवार करून रब्बी हंगामात पेरणी केली. पण अवकाळी पाऊस व धुक्यामुळे हे पिकही वाया गेले.
काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन तसेच महागड्या औषधींची फवारणी करून पिके वाचवली. मात्र बाजारपेठेत शेतीला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
यामुळे गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री हरवले आहेत असे फलकच सार्वजनिक ठिकाणी लावले आहे. शेतकरी नामदेव पतंगे, गजानन कावरखे, पांडुरंग कुटे, दिलीप खिल्लारी, चंद्रकांत किलचे, मारोती कावरखे, आत्माराम कुटेसह इतर शेतकऱ्यांनी बुधवारी गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी हे फलक लावले आहेत.
या बॅनर्सवर मुख्यमंत्र्यांचे वर्णन देखील नमुद करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना सापडून देणाऱ्यास 10 किलो सोयाबीन बक्षीस दिले जाणार असल्याचेही या फलकावर नमुद केले आहे.
या बॅनरवर मुख्यमंत्र्यांचे वर्णन देखील नमुद करण्यात आले आहे. या वर्णनानुसार, मुख्यमंत्र्यांचे नाव एकनाथ संभाजी शिंदे असे आहे. त्यांचा रंग निमगोरा असून, कपाळावर टीळा व डोळ्यांवर चष्मा आहे. याशिवाय त्यांच्या अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट व पँट आहे. हे अनेक दिवसांपासून हरवल्याचा संशय आहे. कारण सन्मानयीय मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, दुष्काळ, पिक विमा, सोयाबीन व कापसाची दरवाढ या शेतकरी प्रश्नांवर बोलत नाहीत.
ज्या कुण्या व्यक्तीला ते भेटतील त्यांनी संपर्क करावा. माहिती देणाऱ्याला 10 किलो सोयाबीन देण्यात येईल. पत्ता- वर्षा बंगला मुंबई, असे बॅनरवर नमूद करण्यात आले.आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी लावलेली बॅनर परिसरात चर्चेचा विषय बनू लागले आहेत. आता तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार काय तसेच पिकविमा, नुकसान भरपाई जाहीर करणार काय? असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.