पुणे – ऑनलाईन बँकिंग विषयक सायबर गुन्हे सातत्याने वाढत असून प्रामुख्याने पुण्यात ज्येष्ठ नागरिक फसण्याचे प्रमाण जास्त आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपायुक्तांनी रिझर्व्ह बँकेला पत्र फसवणूक रोखण्यासाठी बॅंकाच्या मार्गदर्शक सूचनांच्या परिपत्रकात बदल करण्याची मागणी केली होती.
मात्र, त्यानंतर गेल्या दोन वर्षात पोलिसांच्या मागणीबाबत आरबीआयकडून केवळ अभ्यास सुरू असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. त्यामुळे, आरबीआयने पोलिसांच्या मागणीचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक थांबणार असल्याने बॅंकेने याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. शहरात गेल्या वर्षभरात २१ हजार १४७ नागरिक सायबर गुन्हे दाखल झाले असून त्याद्वारे पुणेकरांचे शेकडो कोटी सायबर चोरट्यांनी लुटले आहेत.
काय आहे मागणी
सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एका खात्यावरून दुसर्या खात्यात पैसे वळविले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. एका खात्यातून दुसर्या खात्यात आॅनलाइन रक्कम पाठविताना सर्व प्रमुख बॅंका रिझर्व्ह बँकेच्या २०१० च्या परीपत्रकाचा आधार घेतात. या परीपत्रकात रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की बॅंकांनी पैसे जमा करताना फक्त अकाऊंट नंबर टॅली करावा, अकाऊंटचे नांव टॅली करण्याची गरज नाही. त्यामुळे, पैसे भलत्याच खात्यात जमा गेल्यानंतर खातेदारास आपण फसलो गेल्याचे लक्षात येते.
सायबर गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपायुक्तांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून वरील परीपत्रकात बदल करण्याची मागणी केली होती. बॅंकांनी अकाऊंटचे नांव व अकाऊंट नंबर दोन्ही टॅली झाल्याशिवाय पैसे जमा करु नयेत, अशा प्रकारचे बदल त्यांच्या संगणक प्रणालीत करावेत, असे परिपत्रक रिझर्व्ह बँकेने काढावे अशी मागणी केली होती.
आरबीआय उदासिन
सायबर पोलिसांनी दिलेल्या पत्राबाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयबीआयला माहिती अधिकारात पत्र पाठवित या पत्रावर काय निर्णय घेण्यात आला अशी माहिती विचारण्यात आली. त्यावर उत्तर देताना रिझर्व्ह बँक यासंदर्भात काय करता येईल, याबाबत अभ्यास करत असल्याचे वेलणकर यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे केंद्र सरकारपासून रिझर्व्ह बँकेपर्यंत सर्वजण डिजिटल पेमेंटसाठी आग्रही आहेत. तर, दुसरीकडे त्यातील फ्राॅड रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत मात्र रिझर्व्ह बँक उदासीन आहे, अशी टिका वेलणकर यांनी केली आहे.