पुणे – “म्युकरमायकोसिस’ आजारापासून संरक्षणासाठी मधुमेह रुग्णांनी रक्तशर्करा नियमित तपासावी, तसेच स्टिरॉईडसचा अतिरेक टाळावा. तसेच बुरशीजन्य संसर्गापासून बचावासाठी सध्याच्या परिस्थितीत वैयक्तिक निगा आणि दातांची स्वच्छता महत्त्वाची असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पत्र सूचना कार्यालयाने केलेल्या “म्युकरमायकोसिस आणि दातांची स्वच्छता’ या विषयावर ऑनलाइन वेबिनार आयोजित केला होता. यात केरळ भारतीय वैद्यकीय परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन आणि दंतचिकित्सक डॉ. नीता यांनी मार्गदर्शन केले.
पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात या संसर्गाची लागण जास्त दिसून येते, कारण आपल्याकडे स्व-उपचारावर अजूनही जास्त भर दिला जातो. रक्तातील साखर वाढल्यास रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. ज्यामुळे, न्युट्रोफिलसारख्या पांढऱ्या पेशींवर परिणाम होतो. कोविड रुग्णांच्या तुलनेत म्युकरमायसोसिस रुग्णांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. बुरशी गोड पदार्थ आणि जस्तावर लवकर वाढते.
बुरशी आपल्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे पेशी मृत होतात, त्यावेळी त्यांचा रंग काळा होतो. कोणत्याही रंगावरुन याला नाव देण्यापेक्षा म्युकरमायकोसिस असेच संबोधणे योग्य असल्याचे डॉ. राजीव यांनी नमूद केले.
लसीकरणामुळे होतो बचाव
लसीकरणामुळे प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे आपसूकच म्युकरमायकोसिसपासून बचाव होतो, असे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचे असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले.
बुरशी कोणत्याही अस्वच्छ घटकावर वाढते. त्यामुळे नैसर्गिक जीवाणू सुरक्षित ठेवून बुरशीपासून संरक्षणासाठी नियमितपणे दोन वेळा दातांची स्वच्छता, माऊथवॉशचा वापर करणे आवश्यक आहे. दात काढल्यानंतर ती जागा आणि एकूण तोंडाची स्वच्छता महत्त्वाची आहे.
– डॉ. नीता, दंतचिकित्सक
सातत्याने पाण्याची वाफ घेऊन कोणताही विषाणू मरत नाही. पण, त्याउलट आपल्या शरीरात उपयोगी असलेल्या जीवाणूंना मात्र या वाफेचा फटका बसतो. पण, वाफ घ्यायचीच असल्यास अगदी सौम्य प्रमाणात घ्यावी, तसेच त्यात कोणतीही पाने वा घटक यांचे मिश्रण करू नये. बुरशी शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे एकदम घाबरुन सर्वच वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही.
– डॉ. राजीव जयदेवन, उपाध्यक्ष, केरळ भारतीय वैद्यकीय परिषद