काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यू संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी शोधपत्रकारिता काही दैनिकां नी केली. मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप सर्वच स्तरातून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील साथरोग तज्ज्ञ हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचा हा आढावा…
मिशिगन विद्यापीठाच्या जैव सांख्यकी विभागाच्या प्रमुख आणि प्रख्यात साथरोग तज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या गणितावर भारतात करोनाने 12 लाख जण मरण पावले असावेत, तर 495 दशलक्ष म्हणजे 49 कोटी 50 लाख जणांना संसर्ग झाला असावा. हा त्यांचा प्रकाशनपूर्व शोधनिबंधातील अंदाज आहे. तो मे च्या मध्यातील आकडेवारीवर आधारित आहे. त्याचे पुनरावलोकन केले जाऊ शकते.
“गृहितकांचा फार कमी वापर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही त्यासाठी गणितीय पद्धत वापरली. त्यामुळे मी फार तर वस्तुनिष्ठ असल्याची टीका माझ्यावर करता येऊ शकेल,’ असे त्या सांगतात. मुखर्जी सांगतात, मृत्यूची संख्या खूप जास्त आहे. अशा अनेक घटना आहेत, ज्यात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड तर मिळाला पण मृत्यूचे कारण करोना दाखवण्यात आले नाही. त्याचा थेट परिणाम लक्षात घेतला, तर आमचे गणिती मॉडेल आम्हाला सांगते की, मृतांची संख्या पाचपट आहे. त्यांनी ही माहिती बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
सहव्याधी असणाऱ्या करोना बाधितांचे मृत्यू हे अधिकृत करोनाबळींच्या तपशीलातून वगळण्यात आले आहेत. प्रत्यक्षात करोना विषाणू हेच मृत्यूचे मुख्य कारण तर सहव्याधी हे परिस्थिती बिघडवणारे घटक, असे वर्गीकरण भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले आहे. ग्रामीण भागात ही साथ पसरल्यानंतर या भागात आधीच दुर्बल असणारी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली. तेथे चाचण्यांचे प्रमाण नगण्य आहे त्यामुळे तेथे अनेक मृत्यू करोनामुळे झाले आहेत, हे उघडच झाले नाही. एका दैनिकाच्या वार्तांकन पथकाने गंगा किनाऱ्यावर दोन हजार मृतदेह एक तर पुरले किंवा पाण्यात सोडून दिल्याचे उघड केले.
मुखर्जी सांगतात, भारतातील करोनाच्या साथीचे वर्गीकरण दोन भागांत करू. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्या खूप जास्त प्रमाणात दडवण्यात आली. दुसऱ्या लाटेचा पीक 15 मे रोजी आला. भारताच्या 136 कोटी जनतेच्या 36 टक्के म्हणजे 49 कोटी 50 लाख जनतेला करोना होऊन गेला असावा. त्यानंतर देशातील रुग्णाची संख्या उतरू लागली.
चार आठवड्यांपूर्वी मात्र परिस्थिती भयावह होती. पण अजूनही आपण किनाऱ्याला आलो आहोत, असे मला वाटत नाही. 15 मे रोजी आम्ही आतापर्यंत 49 कोटी 50 लाख जण आमच्या अंदाजानुसार बाधित झाले होते, त्यावेळी सरकार दोन कोटी 48 लाख जण बाधित झाल्याचे सांगत होते. हा आकडा 20 पट कमी होता, असे मुखर्जी म्हणाल्या. त्याच दिवसापर्यंत दोन लाख 70 हजार जण करोनामुळे मरण पावल्याचे सरकार सांगत होते, त्यावेळी आमचा अंदाज 12 लाख जण मरण पावले असा होता. येथेही कमी नोंद हेच कारण आहे, असे मुखर्जी म्हणाल्या.
पहिल्या लाटेपासून म्हणजे एक एप्रिल 2020 पासून या वर्षीच्या 31 जानेवारीपर्यंत कमी नोंदणीचा प्रकार सुरूच होता. या काळात एक कोटी 11 लाख बाधित दाखवले गेले. तर मृत्यू 3.5 लाख दाखवले गेले. सरकार दाखवत असलेली आकडेवारी ही प्रत्यक्षातील संख्येपेक्षा खूप कमी असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने यातील बऱ्या-वाईट स्थितीवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यातील अंदाजानुसार, भारतात 40 कोटी 42 लाख जणांना लागण झाली असावी, तर किमान सहा लाख जण मरण पावले असावेत. यात सर्वाधिक शक्यतेनुसार 53 कोटी 90 लाख जणांना लागण झाली असावी, तर 16 लाख जण मरण पावले असावेत. तर, वाईटात वाईट स्थितीत भारतात 70 कोटी सात लाख लोकांना संसर्ग झाला असावा, तर 42 लाख जण मरण पावले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. हे वृत्त अत्यंत खोटे आणि त्याला कोणताही आधार नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते.
त्याचप्रमाणे “द इकॉनॉमिस्ट’ने म्हटले होते की, भारतात संख्या खूप कमी दाखवली जात आहे. प्रत्यक्षातील संख्या ही त्यापेक्षा दहा ते 30 पट अधिक असू शकते. हीच स्थिती आशिया आणि आफ्रिकेत झालेली असते. वॉशिंग्टनमधील “इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूशन या संस्थेने एक जुलैपर्यंत 10 लाख लोक करोनाने मरण पावतील, असे भाकीत केले आहे. “ब्राऊन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’चे प्राध्यापक आशिष झा यांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा मुखर्जी यांचा अभ्यास अधिक वस्तुनिष्ठ वाटतो.
झा म्हणतात, मे च्या सुरुवातीला भारतातील सर्व स्मशानभूमी ओसंडून वाहत होत्या. त्यावेळी भारतात करोनाने रोज 25 ते 50 हजार जण मरत असावेत आणि रोजचा संसर्ग 20 ते 50 लाखांच्या दरम्यान असावा.देशातील सेरोप्रिव्हीलन्स सर्व्हे आणि आयसीएमआर देते तो बाधितांचा तपशील यातील आकडेवारीतील फरकावरून मुखर्जी आणि अन्य संशोधक बाधितांची नोंदणी कमी झाली असल्याचा निष्कर्ष नोंदवतात. त्यानंतर ते न सापडले संसर्गित आणि मृत्यूशी संबंधित साथीच्या संभाव्यतेच्या मांडणीकडे (मॉडेल) येतात.
राज्य राज्यातील स्थितीत फरक आहे. त्यामुळे राष्ट्रीय पिकचे चित्र चुकीचे उभे राहू शकते. राष्ट्रीय पिकचे चित्र रेखाटले तर आणीबाणीचा काळ संपल्याची भावना तयार होते त्यामुळे काहीसा निष्काळजीपणा येऊ शकतो. प. बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रमधील वाढती संख्या पाहता आणि गोवा, ईशान्य, लक्षद्वीपमधील भयावह स्थिती पाहता अद्याप धोका टळलेला नाही.
प्रत्येक जण सुरक्षित नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही, असा सावधानतेचा इशारा मुखर्जी देतात. हे संशोधक आपली मांडणी करताना अनेक इशारे देतात. प्रत्यक्षात किती मृत्यू झाले याची नेमकी माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे विश्वासार्ह स्रोत नाहीत. त्यामुळेच आणि दुसरी लाट अद्याप सुरू असल्याने ही संख्या अपुरी आहे. त्यात भारतातील राज्यांमध्ये संसर्ग आणि मृत्यू यांच्या आकडेवारीत फरक आहे.
सेरोप्रिव्हीलन्स सर्व्हे आणि एपिडेमोलॉजीकल मॉडेल बाधितांची संख्या आणि मृत्यू याबाबत पहिल्या लाटे संदर्भात अंदाज बांधू शकतात. मात्र अद्ययावत सेरोसर्व्हे आणि अतिरिक्त मृत्यूंचा तपशील दुसऱ्या लाटेबाबत अनुमान काढण्यासाठी आवश्यक आहे, अशी पुस्तीही हे संशोधक जोडतात. भारतात गेल्या रविवारी दोन हजार 722 अधिकृत करोना बळी नोंदवले गेले. 34 दिवसांनंतर प्रथम मृत्यू संख्या तीन हजारांखाली गेली. तर नवीन बाधितांची संख्या एक लाख 53 हजार 663 होती. ही संख्या 50 दिवसांत सर्वात कमी होती. या साऱ्या वातावरणात मिशिगन विद्यापीठाने एक बरी बातमी दिली आहे.
भारतातील संसर्ग मृत्युदर 0.25 टक्के आहे. जगभरात त्याचा दर 0.67 टक्के आणि सरासरी 0.27 टक्के आहे. जर सरकारी आकडेवारी धरली तर पहिल्या लाटेत 0.13 टक्के आणि दुसऱ्या लाटेत आता पर्यंत 0.03 टक्के आहे. दुसऱ्या लाटेत मृत्युदर कमी असण्याची मुख्यतः दोन कारणे असल्याचे संशोधक सांगतात, दुसऱ्या लाटेच्या संपूर्ण तपशीलाची अनुपलब्धता आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी न मिळालेला वेळ हे एक कारण.
दुसरे कारण म्हणजे दोन्ही लाटेतील संसर्गातील वयोगटात असणारा फरक. दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांच्या एका मोठा गटाचे लसीकरण झाले. त्यामुळे तरुण लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला. भारतात तरुणांची संख्या मोठी आहे. 65 वर्षांवरील नागरिकांची लोकसंख्या केवळ 6.4 टक्के आहे. अमेरिकेत हेच प्रमाण 16.5 टक्के आहे.
त्यामुळे भारत आणि प्रगत देश जसे की, अमेरिका यांची मृत्युदराबाबतची तुलना अयोग्य आहे, वयोगटानुसार मृत्युदराची तुलना आणखी तपशील उपलब्ध होईपर्यंत अशक्य आहे, असेही या संशोधन निबंधाचे लेखक म्हणतात. दुसऱ्या लाटेतील मृत्युदर कमी होण्याच्या माहितीबाबत संशोधक एक इशारा देतात. याची खातरजमा वय-लिंग, राष्ट्रव्यापी कालनिहाय बाधित आणि मृत्यू यांचा तपशील उपलब्ध होईपर्यंत अशक्य आहे, असे सांगत असतात.
श्रद्धा गोखले