कात्रज –करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापूर्वी मार्च 2020ला राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद करण्यात आले. निर्बंध शिथील झाल्यानंतर राज्यातील अनेक प्राणी संग्रहालये सुरू झाली. परंतु, महापालिका प्रशासनाने कात्रजचे प्राणी संग्रहालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, अशा स्थितीत व्हीआरपी, राजकीय व्यक्तींना मात्र प्राणी संग्रहालयांत “विशेष’ प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालय “राजकीय खलबते’ करण्याचे स्थळ झाले आहे काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडू लागला आहे.
करोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी कात्रजच्या प्राणी संग्रहलयाचे कुलुप मात्र निघालेले नाही. कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नसताना राजकीय व्हिआयपी लोकांना आत कशासाठी प्रवेश दिला जातो? असा प्रश्न संग्रहालयातील वाहनतळावर दररोज उभ्या राहणाऱ्या राजकीय व्यक्तींच्या गाड्यांमुळे निर्माण होऊ लागला आहे.
प्राणी संग्रहालय लवकरच सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. प्राणी संग्रहालयात कोणत्याही विशेष लोकांना सोडण्यात येत नाही. मात्र, कोणाला पर्यटनांसाठी परवानगी दिली असेल तर त्याची तपासणी करण्यात येईल.
– राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय