पुणे/हिंजवडी – पुणे महापालिका हद्दीच्या वेशीवर असलेल्या मुळशी तालुक्यातील चांदे-नांदे येथील गायरानात होणार्या पुणे महापालिकेच्या सूस येथील स्थलांतरित कचरा प्रकल्पाविरोधात दोन्ही गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट पीएमआरडीए आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांची भेट घेत कचरा प्रकल्पाला विरोध दर्शवित भौगोलिक स्थिती व भूमिका मांडली. दोन्ही गावांचा या प्रस्तावित कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. आमच्यावर बळजबरीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास दोन्ही गावे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा पवित्रा या शिष्टमंडळाने घेतला आहे. पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल तसेच जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविण्यात आला.
यावेळी आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दादाराम मांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे पाटील, चांदे ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक ओव्हाळ, नांदे ग्रामपंचायतीच्या सरपंच निकिता रानवडे, उपसरपंच संघमित्रा ओव्हाळ, कुंडलिक मांडेकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, पीएमआरडीएचा विकास आराखडा अद्याप प्रलंबित आहे. तो अंतिम होण्यापूर्वी हा प्रकल्प येथे कसा येऊ शकतो. पुणे महापालिकेने त्यांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करून पालिकेच्या हद्दीतीलच गावात त्यांचा कचरा निर्मूलन प्रकल्प उभारावा, ग्रामीण भागात पुणे महापालिकेच्या या कचरा प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध आहे. नांदेच्या सरपंच निकिता रानवडे म्हणाल्या की, ग्रामसभेत कचरा प्रकल्पाला ग्रामस्थांनी एकमुखाने विरोध केलेला आहे. सरकार आमच्यावर बळजबरीने महापालिकेचा कचरा प्रकल्प लादत आहे. पुणे महापालिकेने स्वतःच्या हद्दीत कुठे ही कचरा प्रकल्प उभारावा. अन्यथा न्यायालयात धाव घेऊ, असे चांदे गावचे सरपंच अशोक ओव्हाळ यांनी सांगितले.
“आमच्याकडे या दोन्ही गावच्या गायरान जागांची माहिती पुणे महापालिकेने मागितल्याने आम्ही आवश्यक बाबींचा पूर्तता अहवाल सादर करून पाठविला आहे. परंतु, याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.” – राहुल महिवाल, आयुक्त पीएमआरडीए