आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथे सोमवारी (दि. 22) 11 जोडप्यांचा मोठ्या उत्साहात सामूदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडले. या बिगर हुंडा विवाह सोहळ्यात वेल्हे, जुन्नर, बार्शी, सोलापूर, जावळी अशा विविध भागातील विविध जाती समूदायातील जोडप्यांचा समावेश होता.
श्री मुकुंदा सामाजिक संस्थेच्या वतीने फ्रुटवाले धर्मशाळा येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्षे होते. यावेळी आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई, दिव्यांचा झगमगाट, वर्हाडी मंडळींना बसण्यासाठ गालीच्या खुर्च्यांची उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. सुमारे 4 हजारांपेक्षा अधिक वर्हाडी मंडळी या सोहळ्यासाठी आले होते. भारतीय परंपरेनुसार वैदिक पद्धतीने सर्व जोडप्यांचे सर्व विधी साखरपुडा, हळद, लग्न सोहळा, ब्रह्मवृंद, साधू संत यांच्या शुभाशिर्वादाने जोडप्यांच्या मस्तकी अक्षता टाकून अतिशय थाटामाटत हा विवाह सोहळा पार पडला.
या सोहळ्यात सर्व विवाहबद्ध झालेल्या नववधूवरांना संपूर्ण पोशाख, संसारोपयोगी साहित्य, मणीमंगळसूत्र यासह आदी वस्तू मोफत देण्यात आल्या. तसेच वर्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन देण्यात आले. डोळे दिपवणारा हा सामुदायिक सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पाहुन आळंदीकर देखील गहिवरले.
“कै. भाऊसाहेब पांडुरंग चव्हाण यांच्या कृपाशीर्वादाने सलग दुसर्या वर्षी या बिगर हुंडा सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. गोरगरिब, शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावल्याने खुप आनंद झाला. या सोहळ्यात विविध जातीचे तसेच विविध भागातील जोडपे सहभागी झाले होते. गुरुआज्ञा झाल्याने हे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. समाजाची सेवा करणे हेच आमचे ध्येय आहे.” – राकेश चव्हाण, संस्थापक अध्यक्ष, श्री मुकुंदा सामाजिक संस्था
“आमच्या नातेवाइकांकडून या सोहळ्याबाबत माहिती मिळाली. गेल्या वर्षी याच सोहळ्यात त्यांचे लग्न झाले होते. खुप चांगली व्यवस्था करण्यात आली. घरी लग्न केले असते तरी इतक्या चांगल्या प्रकारे करू शकलो नसतो. आयोजकांचा मी आणि माझे कुटुंब खुप आभारी आहोत.” – नवरदेव रांजणे, रा. घोटेघर, ता. जावळी, जि. सातारा