पुणे -शहराचा पाणी वापर नियंत्रित करायचा असल्यास महापालिकेने शहरात स्वतंत्र घरे, व्यावसायिक मिळकती तसेच सोसायट्यांना बसविण्यात आलेल्या मीटरनुसार पाणीपट्टी आकारणीस मान्यता द्यावी, अशी मागणी महापालिकेने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीस शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विरोध केला आहे. हा निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पालिकेचे शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.
सुतार म्हणाले की, ही पाणीपुरवठ्याची फसवी योजना पुणे शहरामध्ये मनपाने राबविली आहे. याचा डीपीआर मुख्य सभेने जो मान्य केला त्याप्रमाणे प्रत्यक्षात नाही. मनपा अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मनपाला आर्थिक भुर्दंड बसला आहे. सदरचे पैसे हे पुणेकरांच्या कररूपी पैशातून दिले जात आहेत. ही योजना फक्त काही लोकांच्या फायद्यासाठी राबविण्यात येत आहे. प्रकल्प आराखडा, निविदा प्रक्रिया तसेच तांत्रिक बदल पुन्हा करणे आवश्यक आहे. ज्यामुळे प्रकल्प खर्चामध्ये बचत होऊन मनपाची आर्थिक बचत होईल, असे सुतार यांनी स्पष्ट केले.
जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना समान पाणी या मूळ योजनेप्रमाणे 24 तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर पुणेकरांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, असा इशारा सुतार यांनी दिला आहे.