पुणे – करोना काळात गणेशोत्सव साधेपणानं साजरा करावा लागला. पण, या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा कायम ठेवण्यासाठी गणेशोत्सवात दहा दिवस श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या पुढाकारातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं.
ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्यापासून हिंदी चित्रपट क्षेत्रातील मातब्बर गायक जावेद अली यांच्यापर्यंत अनेक मान्यवर कलाकारांनी या महोत्सवात सहभाग घेतला. गेल्या काही महिन्यांपासून सांस्कृतिक क्षेत्र ठप्प असताना या ऑनलाइन महोत्सवाच्या माध्यमातून दीर्घ काळानंतर सादरीकरणाची संधी मिळाल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली.
गेल्यावर्षी करोनाचे आव्हान उभे ठाकलेले असताना गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी पहिल्यांदाच ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव सुरू केला. यंदा दुसऱ्या वर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे, कवी संदीप खरे, वैभव जोशी, ज्येष्ठ तबलावादक पं. विजय घाटे, ज्येष्ठ बासरीवादक राकेश चौरासिया, अमर ओक, वरद कठापूरकर, निलेश देशपांडे यांच्यासोबत गायक पं. रघुनंदन पणशीकर, पं. आनंद भाटे, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. शौनक अभिषेकी, हृषिकेश रानडे, विश्वजित बोरवणकर, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी, अंजली मराठे, जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, स्वरदा गोडबोले, प्रसिद्ध गायक जावेद अली अशा मान्यवरांनी महोत्सवात सादरीकरण केले. तसेच गणेशोत्सवातून घडलेले आणि सध्या विविध राजकीय पक्षांत कार्यरत असलेले नेतेही गणेशोत्सवातील गप्पांमध्ये सहभागी झाले.
या संपूर्ण महोत्सवात मिलिंद कुलकर्णी, स्वानंदी टिकेकर आणि भार्गवी चिरमुले यांनी उत्तम सूत्रसंचालन करून कार्यक्रमांची रंगत वाढवली. त्यामुळे प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी अनुभवायला मिळाली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वेबसाइटवरून प्रसारित झालेल्या या महोत्सवातील कार्यक्रम 26 लाखांहून अधिक कुटुंबांनी पाहिले. संपूर्ण भारतासह अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूएई, युके तसेच अजूनही बऱ्याच देशांतून या महोत्सवातील कार्यक्रमांना प्रेक्षक लाभले आहेत.
कलावंत म्हणतात…
“करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्र ठप्प आहे. कलाकारांसाठी प्रेक्षक हा ऑक्सिजनप्रमाणे असतो. त्यामुळे प्रेक्षकांसमोर कला सादर करायला मिळणं कलाकारांसाठी अतिशय महत्त्वाची बाब असते. पण करोनामुळे ही प्रक्रियाच थांबली.
गणेशोत्सव हा कलाकारांसाठी फार महत्त्वाचा असतो. करोना काळातील निर्बंधांमुळे गणेशोत्सवातील कार्यक्रमही होऊ शकत नव्हते. अशा काळात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचा पायंडा पाडणे ही मोठी गोष्ट आहे. त्यात आम्हा कलाकारांना सादरीकरणाची संधी मिळाल्याचा अतिशय आनंद आहे. या निमित्ताने दीर्घकाळानं प्रत्यक्ष रंगमंचावर आमची कला सादर करायला मिळाली. त्याची भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत,’ अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.