हिंजवडी – ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणा की ज्या पूर्वी लोकांना माहीतच नव्हत्या. त्या यंत्रणांचा गैरवापर केंद्र सरकार करत आहे. कुणाच्या घरी कधी धाड पडणार हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना आधीच माहीत असते. त्यामुळे सत्ता ही कायम कुणाचीच नसते हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सूचक इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी भाजप सरकार व त्यांच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
त्या म्हणाल्या, तुम्ही निवडणुकांमध्ये शिवरायांचे नाव घेता आणि संजय राऊत, एकनाथ खडसे यांच्या घरच्यांना ईडी, सीबीआय मार्फत चौकशीसाठी बोलावता, तासन्तास चौकशी करता ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे. आगामी निवडणुकांत महाविकास आघाडी होईल की हे माहीत नाही; परंतु प्रत्येकाने आपली ताकद वाढविली पाहिजे. तेव्हाच अन्य पक्ष तुमच्याशी आघाडीबाबत चर्चेला पुढे येतील.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुठल्याही घटकावर अन्याय होऊ देणार नाही. मुळशीला पिण्याचे पाण्याच्या योजनेबाबत पालकमंत्री अजित पवार स्वतः पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे भविष्यात कितीही नागरीकरण वाढले तरी मुळशीकरांना पाणी कधीच कमी पडू देणार नाही.
कोविड काळात जिल्हा परिषद व प्रशासनाने चांगले काम केले आहे. लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात नंबर एक ठरला आहे. जिल्हा परिषदेने केलेली कामे पक्ष संघटनेने तळागाळातील लोकांपर्यंत पोचवली पाहिजेत. मागच्या सरकारमध्ये पुण्याचे पालकमंत्री कोण होते हे तरी कुणाला माहीत आहे का? त्यामुळे आपल्या हक्काचा माणूस अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्यातील सर्व गावांचा सखोल अभ्यास त्यांना आहे.
त्यामुळे त्यांच्याकडून पुणे जिल्ह्याला विकासकामांसाठी कुठेही निधीची कमतरता पडणार नाही.या वेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदेशचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा भारती शेवाळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, दूध संघाचे संचालक रामभाऊ ठोंबरे, मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे
जिल्हा परिषद सदस्य अंजली कांबळे, माजी सभापती रवींद्र कंधारे, माजी गटनेते शांताराम इंगवले, उपसभापती विजय केदारी, युवकचे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, युवा नेते सुरेश हुलावळे, कार्याध्यक्ष अंकुश मोरे, अमित कंधारे, दीपाली कोकरे, वैशाली गोपालघरे यांच्यासह विविध गावचे सरपंच व पक्षसंघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने
उपस्थित होते.
या वेळी आयटी परिसरातील संदीप साठे, रामदास पायगुडे, समीर बुचडे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्तीपेक्षा पक्षनिष्ठा जोपासणाऱ्यांना संधी देण्याची मागणी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. माण गणात उमेदवारी मिळविण्यासाठी बाबाजी शेळके यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.
ताई पक्षाचे काम न करणाऱ्यांनाच मोठी पदे का?
या वेळी माजी सभापती रवींद्र कंधारे यांनी सुळे यांच्यासमोरच पक्षातील अंतर्गत गटबाजी व संघटनेकडून प्रटोकॉल पाळला जात नसल्याची टीका जाहीरपणे केली. ते म्हणाले, ज्यांनी मागच्या निवडणुकांत पक्षविरोधी भूमिका घेऊन दुसऱ्यांना मदत केली. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना मोठी पदे दिली जातात. याचाही पक्षाने विचार केला पाहिजे.
“बॅंके’ला आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा
या वेळी सुळे यांनी आपल्या पक्षात तालुक्यातून पीडीसीसी बॅंकेला प्रतिनिधी कोण आहे असा सवाल उपस्थितांना विचारताच पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आपल्या पक्षाचा कुणीच नसून आता तो संचालक अन्य पक्षाचा असल्याचे सांगितले. त्यावर जिल्हा बॅंकेचे संचालक आत्माराम कलाटे यांचे नाव न घेता सुळे म्हणाल्या, या वेळेस आपल्याला बॅंकेचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. आपल्या विचारांचा आपला हक्काचा माणूस बॅंकेवर निवडून आणायचा आहे.