पुणे – “पूर्वी भूमिपूजने व्हायची, पण उद्घाटने कधी झाले, हे कळायचे नाही. पण, पाच वर्षांपूर्वी मेट्रोच्या भूमिपूजनाला मला निमंत्रित केले होते; आता प्रकल्प पूर्ण होऊन उद्घाटन करण्याची संधी दिली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात, हा संदेश यामध्ये आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
कोथरूड एमआयटी येथील मैदानावर आयोजित सभेत मोदी बोलत होते. त्यांच्या हस्ते मेट्रोच्या एका मार्गिकेचे उद्घाटन, मुळा-मुठा नदी स्वच्छता प्रकल्प, मुळा-मुठा नदीकाठसुधार प्रकल्प, 100 ई-बसेस आणि ई-डेपो लोकार्पण, बालेवाडी येथे महापालिकेतर्फे साकारलेले व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्र गॅलरीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात मराठी भाषेत केली.
कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर आदी यावेळी उपस्थित होते. चांदीच्या तबकात जिरेटोपची प्रतिकृती देऊन महापालिकेतर्फे मोदी यांचा सत्कार करण्यात आला. दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या स्नुषा उषा लक्ष्मण यांनी पुस्तक भेट दिले.
कितीही मोठी व्यक्ती असली, तरी मेट्रोनेच प्रवास करा
समाजात कितीही मोठीही व्यक्ती असली, तरी त्यांनी मेट्रोने प्रवास करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असा सल्ला मोदींनी दिला. मेट्रो प्रवासामुळे शहराच्या पर्यावरणपूरकतेला मदत होईल, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली
स्वातंत्र्यलढ्यात पुण्याने दिलेल्या योगदानाची आठवण करून देताना पंतप्रधानांनी लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट, आर. जी. भांडारकर आणि महादेव गोविंद रानडे या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. रामभाऊ म्हाळगी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचीही आज आठवण येत असल्याचे मोदी म्हणाले.
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील सोयी उभाराव्यात
सन 2030 मध्ये शहराची लोकसंख्या 60 कोटी होईल. ते लक्षात घेता शहरांना अधिक आधुनिक बनवावे लागेल आणि नव्या सुविधांचे निर्माणही कराव्या लागतील. भविष्यातील शहरांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकार काम करत आहे. प्रत्येक शहरात पर्यावरण अनुकूल वाहतुकीला आणि त्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्व सुविधांना आधुनिक बनवणारे एकात्मिक नियंत्रण केंद्र असावे. शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन पद्धत आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजचे आहे. जलस्रोतांच्या आणि ऊर्जेच्या पूर्ण कार्यक्षम उपयोगावर भर देणेही आवश्यक आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.
इथेनॉल आणि जैविक इंधनावर भर द्यावा
शहरात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न होत आहे. पुण्याची ओळख “ग्रीन फ्युएल सेंटर’ म्हणून होत आहे. प्रदूषणपासून मुक्ती, कच्च्या इंधनाच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी इथेनॉल आणि जैविक इंधनावर भर देण्यात येत आहे. पुण्यात इथेनॉल ब्रॅंडिंगशी निगडीत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
…ही तर संकल्पपूर्ती : महापौर मोहोळ
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले त्यामुळे हा आनंदाचा क्षण आहे. ज्यांच्या हस्ते या मेट्रोचे भूमिपूजन झाले त्यांच्याच हस्ते याचे उद्घाटन होणे म्हणजे ही संकल्पपूर्ती आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे नुसते राजेच नव्हते तर उत्तम राज्यकर्ते, प्रशासक होते. ती प्रेरणा या पुतळ्याकडे पाहून मिळेल. महापालिकेच्या इतिहासात 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान महापालिकेत आले आहेत. मुळा-मुठा नदीच्या पुनरुत्थानासाठी केंद्रसरकारने मदत केली. यासाठी जायकाने कर्ज दिले पण केंद्राने आपल्याला 841 कोटी रुपये अनुदानस्वरूपात दिले. या प्रकल्पासाठी सगळ्यांचे हात लागले, असे सांगून नदीस्वच्छता आणि नदीकाठसुधार या प्रकल्पांची माहिती मोहोळ यांनी दिली. याशिवाय ई-बस याविषयीही माहिती दिली. देशातील पहिला ई-बस डेपो पुण्यात झाला आहे, असे सांगून पुण्यात झालेल्या विकास कामांचा मोहोळ यांनी आढावा घेतला.
मोदी सरकार पुणेकरांच्या पाठीशी भक्कम : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. पुण्याची स्वत:ची मेट्रो आता सुरू झाली आहे. पंतप्रधानांनी स्वत: तिकीट काढून प्रवास केला आहे. महामेट्रोने विक्रमी वेळेत काम पूर्ण केले आहे. नॉन शेअरबॉक्स रेव्हेन्यू 50 टक्के असेल हे पुणे मेट्रोने प्रस्थापित केले आहे, असे विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एक थेंबही सांडपाणी जाणार नाही अशी पुण्याची नदीही लवकरच पहायला मिळेल. येत्या काळात महापालिका शंभर टक्के दळणवळण ही क्लिन फ्युएलवर करेल. यातून प्रदूषण होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महापालिकेच्या पाठीमागे भक्कमपणे उभे म्हणून ही कामे झाल्याचे फडणवीस म्हणाले.
वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करा
“पुण्यातील दोन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकार मदत करत आहेच. परंतु या ज्या जीवनवाहिन्या आहेत, त्यांच्यासाठी वर्षातून एखाद्या ठराविक दिवशी “नदी उत्सव’ साजरा करावा. तिच्याप्रती श्रद्धा, पर्यावरणविषयक प्रशिक्षण आदी उपक्रम करून नदीचे महत्त्व पुढच्या पिढीला सांगावे,’ असा सल्ला मोदींनी दिला.