त्रिभूज शेळके
पारगाव -दौंड तालुक्यात सहकारी संस्थांचा निवडणुकांचा आखाडा तापला आहे. यात स्थानिक पातळीवर आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटात लढती होत आहेत. गावातील सत्ताधारी गटात विरोधक सामील होत आहे. कुल- थोरात गटांतील स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा खुंटीला टांगून सत्तेच्या सारीपाटापर्यंत पोहोचण्याचा आटापिटा सुरू केल्याचे चित्र दौंड तालुक्यातील अनेक गावांच्या सोसायटी निवडणुकीत दिसून येत आहे. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमधील ही मांडवली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर परिणाम करणारी आहे, असे दोन्ही गटांचे निष्ठावंत कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत.
दौड तालुक्यात सहकारी सोसायटींच्या निवडणूकांचा धुरळा जोरात वादळी वाऱ्याप्रमाणे उडत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आतापर्यंत गटा-तटाच्या राजकारणात 36 चा आकडा असणारे यावेळी गट-तट बाजूला ठेवून 63 च्या आकड्यात रूपांतरित झाले आहेत. त्यामुळे “तुझ्या गळा, माझ्या गळा’ असे चित्र दौंड तालुक्यात अनेक गावांमध्ये पहावयास मिळत आहे. हे जरी सध्या सहकार सोसायटीच्या निवडणूक पुरते मनोमिलन झाले असले तरी याचा दूरगामी परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर काय होऊ शकतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दौड तालुक्यात भाजपा व राष्ट्रवादी हेच प्रबळ पक्ष आहेत. सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. परंतु गावापातळीवरील एकाच पक्षातील गटबाजीमुळे त्या त्या पक्षातील काही प्रमुख कार्यकर्ते आतापर्यंतच्या विरोधी गटात दाखल होऊन आपल्या कार्यकर्त्याला किंवा स्वतः उमेदवारी घेतली आहे. काही ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजीमुळे चांगल्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी न दिल्याने त्यांनी सवतासुभा उभा करुन पक्ष संघटनेला एक प्रकारे आव्हान दिले आहे. निश्चितच हे आगामी निवडणुकीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. काही ठिकाणी ग्रामपंचायत, यात्रा, तंटामुक्तीचे अध्यक्ष आदी ठिकाणी झालेल्या कुरघोडींचा वचपा या निवडणुकीत काढण्यासाठी काहींनी तर विडाच उचलला आहे. बाकी काही असले तरी गटा तटाच्या राजकारणात 36 आकडा असणारे यावेळेस 63 च्या आकडा करुन बसले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत त्याचे काय परिणाम होणार, हे पाहणे औत्सुक्याचे
ठरणार आहे.
ग्रामपंचायतीची बक्षीस योजना बासनात
गेल्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीवेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी बक्षीस योजना जाहीर केली होती. त्यावेळी दौंड तालुक्यात थोरात गटांनी याकडे दुर्लक्ष केले होते. त्यावेळी कुल-थोरात गटांत चुरशीने निवडणुका झाल्या होत्या. ही योजना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पचनी पडली नसल्याचे निवडणूक आकडेवारीवरून दिसून आले होते. ही योजना बासनात गुंडाळल्यानंतर आता सहकाराच्या आखाड्यात मांडवलीचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी चक्रावले आहेत. त्याचा परिणाम स्थानिक घडामोडीत आणि बेरजेच्या राजकारणात तोट्याचा ठरू शकतो, अशी सध्यस्थितीवर चर्चा होत आहे.