पुणे – यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला, तरी महापालिकेच्या शाळांमध्ये अद्याप शिक्षकच आलेले नाहीत. धक्कादायक म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच विद्यार्थ्यांना गणवेष, शालेय साहित्य, दप्तर, बूट यासाठीचे अनुदान डीबीटीद्वारे मिळणे अपेक्षित होते. पण, शिक्षक नसल्याने मुलांचा पटच अद्यापही निश्चित झालेला नाही. त्यामुळे मुले मागील वर्षाचे शैक्षणिक साहित्यच वापरत आहेत. महापालिकेच्या शहरात 285 हून अधिक शाळा असून या शाळांमध्ये एक लाखभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
राज्यशासनाच्या आदेशानुसार आंतर जिल्हा बदली अंतर्गत शिक्षण मंडळात सुमारे 219 शिक्षकांना मान्यता देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात त्यातील 37 शिक्षकच हजर झाले आहेत. तर इतर शिक्षकांकडून काहीच कळविण्यात आलेले नाहीत. विद्यार्थी पटसंख्या निश्चित नसल्याने महापालिकेस शिक्षक व कर्मचाऱ्यांचे संख्या निश्चित होत नाहीये. तर संच मान्यता करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आवश्यक असून हे कामच शिक्षण विभागकडून संथ गतीने केले जात आहे. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झालेला असून उपलब्ध शिक्षकच सर्व वर्ग सांभाळत असून त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर थेट परिणाम होत आहे.
अद्यापही अनेक शिक्षक हजर न झाल्याने मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांसाठी हंगामी शिक्षक भरतीसाठी प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. याशिवाय सध्या शाळेत येत असलेल्या मुलांचा आकडा निश्चित करून त्यांना डीबीटी लवकरात लवकर देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे, असे मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले.
शालेय साहित्यही नाही
महापालिकेच्या शाळांमधील मुलांना पुस्तकांसह, वह्या, शैक्षणिक साहित्य, गणवेश, बूट तसेच रेनकोट आणि स्वेटरसाठी महापालिकेकडून डीबीटीच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. त्यासाठी बाजारातून दर मागवून या साहित्याची रक्कम थेट मुलांच्या बॅंक खात्यता जमा केले जातात. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी जातो. मात्र, यंदा शिक्षकच नसल्याने तसेच विद्यार्थी पटसंख्या निश्चित करण्याचे काम अर्धवटच असल्याने महापालिकेने “डीबीटी’ची प्रक्रियाच केलेली नाही. महापालिका दरवर्षी रेनकोटचे पैसेही देते. मात्र, आता पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असून महापालिकेची डीबीटी होईपर्यंत आणखी दोन महिने जाणार आहेत. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतरच मुलांना रेनकोट मिळण्याची चिन्हे आहेत.