पुणे, {प्रभात वृत्तसेवा}– त्यागी, तपस्वी, बलिदानी व समर्पित भावनेने योगदान देणारी प्रतिभावंत व्यक्तिमत्वेच इतिहास घडवतात. रौप्यमहोत्सवी वर्षात सूर्यदत्त संस्थेने सन्मानित केलेली ही रत्ने आदर्शवत आहेत. देशाच्या प्रगतीचे पंख असलेल्या युवा पिढीला दिशा देण्याचे कार्य सूर्यदत्त संस्था करीत आहे, असे प्रतिपादन अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आचार्य लोकेश मुनी यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वर्धापनदिनी सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, शिक्षण तज्ज्ञ प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते.
प्रत्येक जण कर्तृत्वाने आपले मोठेपण सिद्ध करतो. त्यामुळे आपल्या बाह्यरूपापेक्षा अंतर्मन चांगले हवे. सकारात्मक मानसिकता व कौशल्य आत्मसात करून विधायक कार्य उभारावे, असे गौर गोपाल दास यांनी नमूद केले. श्याम जाजू म्हणाले, की देशात वेगाने परिवर्तन व प्रगती होत आहे. यामध्ये सूर्यदत्तसारख्या संस्थांचे योगदान मोलाचे आहे. गुणग्राहकता ही भारतीयांची ओळख आहे. समाजातील कर्तृत्ववान लोकांचा सन्मान समाजाला प्रेरणा देतो. हेच काम सूर्यदत्त गेली २२ वर्षे करीत आहे.
विठ्ठल मणियार म्हणाले, की अतिशय खडतर संघर्षातून सूर्यदत्त संस्थेची प्रगती झाली असून, या प्रवासात संजय चोरडिया यांना सुषमा यांची योग्य साथ मिळाल्याने हा यशाचा टप्पा गाठता आला. प्रास्ताविकात डॉ. संजय चोरडिया यांनी हा पुरस्कार सोहळा विद्यार्थ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारा असल्याचे सांगितले. आनंद सिंह, प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.