पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे २०२४-२५ या नव्या शैक्षणिक वर्षांपासून शाळा सकाळी ९ नंतर भरणार आहेत.
राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. यातून विविध महत्वाच्या बाबी समोर आल्या. बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, उशिरापर्यंत सुरु असलेले ध्वनिप्रदूषण यामुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत. सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही, त्याचा नकारात्मक परिणाम आरोग्यावर होतो.
पालकांच्या मते पाल्याची झोप पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी ते तयार नसतात. दिवसभर आळसलेले दिसून येतात. यातून अभ्यासाठीचा उत्साह कमी होतो. पावसाळ्यात तसेच थंडीत अनेक विद्यार्थी आजारी पडतात, यातून पालकांचीही ओढाताण होते. या बाबी आढळून आल्या आहेत.
शाळेच्या वेळेत बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा – २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी लागणार आहे.
शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा, शहरी भागात वाहतूक समस्या निर्माण होऊ शकते. दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी वेळेचे नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा लागणार आहे.
शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल अशा शाळांना शिक्षणाधिकारी, शिक्षण निरिक्षक यांचे मार्गदर्शन घेऊन अडचण सोडवावी लागणार आहे. शासनाच्या सूचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करतील, याची दक्षता प्राथमिक शिक्षण संचालक यांना घ्यावी लागणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी आदेश काढले आहेत.