लोणी काळभोर, -पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळातील उन्हाळ्यात नवा मुुठा उजव्या कालव्यामधून पाणी मिळणे अत्यंत कठीण असून आगामी उन्हाळ्यात शेतातील पिकांना कसे पाणी द्यायचे, हा प्रश्न या शेतकर्यांना भेडसावणार आहे.
हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील 66 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना उजव्या मुठा कालव्यामधून पाणी पुरवठा होतो. खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणातील पाणी नवा मुठा उजव्या कालव्यामधून या तीन तालुक्यातील शेतीला व पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. काही वर्षांपूर्वी पुणे शहराची लोकसंख्या कमी होती.
त्यावेळी साडेसहा टीएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी पुरेसे होते. नंतर काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात, शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे ते साडेअकरा टीएमसी करण्यात आले. आता ते जवळपास 14 टीएमसीपर्यंत वाढले आहे. पुणे शहराची पाण्याची मागणी साडेसहा टीएमसी वरून चौदा टीएमसी पर्यंत गेल्याने शेतीला उपलब्ध होणारे पाणी फार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत गेल्या काही वर्षात शहरी व ग्रामीण असा नवीनच वाद यामुळे उभा राहिला आहे. आगामी काळात या वादाचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
यंदा तीनल टीएमसी पाणी कमी
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी आहे. गतवर्षीच्या पावसाळ्याच्या शेवटी धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे खडकवासला धरण साखळीतील धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत.
त्यामुळे चालू वर्षी खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात मिळून गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साधारण तीन टीएमसी पाणी कमी आहे. शेतीला सोडण्यात येणारे कालव्यातील पाणी दहा दिवसांपासून बंद करण्यात आले आहे.
दोन – तीन महिने अत्यंत कसोटीचे
आगामी काळात अजून एक आवर्तन कालव्यातून सोडण्यात येणार आहे अशी चर्चा आहे; मात्र हे आवर्तन कमी दिवसांचे असण्याची शक्यता आहे. कडक उन्हाळ्यात शेतातील पिकांना वारंवार पाणी द्यावे लागते; मात्र कालव्यातून कमी पाणी आल्यामुळे लाभक्षेत्रातील जमिनीतील पाण्याचे प्रमाण खूप कमी होते.
त्यामुळे विहिरी, बोअर यातील पाणी कमी होते. तसेच पाणीपट्टी भरून कालव्यातून पाणी घेणा-या दौंड व इंदापूर तालुक्यातील शेतक-यांनाही कमी पाणी मिळते. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतक-यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे पुढील दोन – तीन महिने शेतकर्यांसाठी अत्यंत कसोटीचे असणार आहेत.
…तर नळपाणी योजना संकटात
हवेली, दौंड व इंदापूर या तीनही तालुक्यातील कालव्याच्या कडेला बहुतेक ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणार्या विहिरी आहेत. या विहिरीतून पाणी उपसून गावांना पिण्यासाठी पुरविले जाते. कालव्याला पाणी असल्यानंतर या विहिरींना भरपूर पाणी असते. कालव्याला पाणी नसल्यास या सर्व पाणीपुरवठा करणार्या विहिरींचे पाणी लक्षणीयरित्या कमी होते. त्यामुळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. कालव्याला जर महिन्यापेक्षा जास्त काळ पाणी नसल्यास बहुतेक विहीरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर असतात.