पुणे – गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात शनिवारी बाप्पा विराजमान झाले. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने घरोघरी आणि गणेश मंडळांमध्ये गणरायांचे मंगलमय वातावरणात आगमन झाले.
यावेळी ‘करोनाचे संकट दूर व्हावे’ अशी प्रार्थना भाविकांनी केली. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘मोरया… मोरया’, ‘एक दोन तीन चार… गणपतीचा जयजयकर’ या जयघोषासह मंत्रोच्चाराने शनिवारी गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला.
शनिवारी सकाळचा मुहूर्त असल्याने भाविकांनी शुक्रवारी सायंकाळी मूर्ती घरी नेण्याला प्राधान्य दिले. नागरिकांनी मास्क,सेनिटायजरसह फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केल्याचे चित्र यावेळी दिसले. दरवर्षी होणार्या जंगी आगमनाच्या ऐवजी, यंदा साधेपणाने आगमन झाले. विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
शहरातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालिम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या पाच मानाच्या गणपतीसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि अखिल मंडई मंडळ आदी प्रमुख गणपतींची प्रतिष्ठापना देखील दुपारपर्यंत मंडळाच्या पदाधिकार्यांच्या हस्ते झाली. यानंतर घरोघरी मोदकासह विविध पक्वनांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.