जलवाहिनी योजनेसाठी पिसोळीचे सरपंच मच्छिंद्र दगडे यांचे महापौरांना निवेदन
कोंढवा – पिसोळी गावासाठी पुणे महापालिकेकडून हडपसर-रामटेकडी येथील टाकीवरून होणारा पाणीपुरवठा अनियमित व अपुरा असून जलवाहिन्यादेखील जुन्या झाल्या आहेत. जागोजागी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे 22 मार्चपासून करोना महामारीच्या काळात गावाला होणारा पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने पिसोळी गावासाठी कोंढवा येथून स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करून द्यावी, यासाठी होणारा सर्व खर्च व पाणीपट्टी भरण्यास ग्रामपंचायत तयार आहे.
पालिकेने केवळ या कामासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सरपंच मच्छिंद्र दगडे यांनी केली आहे. याबाबत सरपंच मच्छिंद्र दगडे म्हणाले की, पिसोळी व उंड्री या गावांचे नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या या गावांना पालिकेकडूनच पाणीपुरवठा होतो.
हडपसर-रामटेकडी येथील टाकीवरून दिवसाआड होणारा पाणीपुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी पडत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही जुनाट झाल्याने जागोजागी मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोंढवा येथील टाकीवरून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यास पुणे महापालिकेने मंजुरी द्यावी. या जलवाहिनीचा संपूर्ण खर्च करण्यास तसेच पालिकेची पाणीपट्टीदेखील भरण्यास देखील पिसोळी ग्रामपंचायत तयार आहे. पालिकेने केवळ जलवाहिनी टाकण्यास मंजुरी व परवानगी द्यावी, अशी लेखी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पिसोळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मच्छिंद्र दगडे यांनी केली आहे. यावेळी नगरसेवक मारुती तुपे, उपसरपंच दिपक धावडे, माजी उपसरपंच गणपत दगडे, माजी सरपंच स्नेहल दगडे, किरण येप्रे, ग्रामपंचायत सदस्या प्रज्ञा दगडे, दिक्षा निंबाळकर, रेश्मा कांबळे आदी उपस्थित होते.
पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद
करोना महामारीच्या काळात गेल्या पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटंकती करावी लागत असल्याने पालिका पदाधिकारी व प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून पिसोळी आणि उंड्री गावासाठी नवीन जलवाहिनीच्या कामास तातडीने मंजुरी देऊन या भागाची पाणीसमस्या कायमची सोडवावी, अशी मागणी होत आहे.