पुणे,{प्रभात वृत्तसेवा} : शहरातील तलाव, तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी येते. या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी फोफावत असल्याने महापालिकेस आरोग्याच्या समस्यांसह ती काढण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यावर तोडगा म्हणून महापालिकेकडून आता जलपर्णीवर ड्रेनझाईमचा (बायो एन्झाईम) वापर करण्यात आला आहे. राम नदीवरी बावधन परिसरात साठलेल्या जलपर्णीवर नियंत्रित स्वरूपात या बायो एन्झाईमचा वापर करण्यात आला असून, अवघ्या चार दिवसांत जलपर्णी नदीतच सुकून गेली. ती सहज काढताही येत आहे.
दरम्यान, या प्रयोगापूर्वी महापालिकेने या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतलेले असून आता जलपर्णी सुकल्यानंतरचे पाण्याचे नमुने घेतले जाणार असून हे बायो एन्झाईम किती सुरक्षित आहे. तसेच त्याचा नदीच्या पाण्यावर अथवा आसपासच्या इतर जैवविविधतेवर काय दुष्परिणाम झाला आहे का हे महापालिकेकडून तपासण्यात येत आहे.
पाणी शुद्ध करण्यासाठी होतो वापर
ड्रेनझाईम (बायो एन्झाईम) हे पाणी शद्ध करण्यासाठी वापरतात. जलपर्णी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी स्वच्छ पाण्यात मिसळते, त्या भागात फोफावते. महापालिका जलपर्णी तोडून काढते. त्यामुळे ती अर्धवटच निघते, तसेच त्याची मुळे खालीच राहिल्याने ती पुन्हा पुन्हा वाढते. त्यामुळे ती एकतर मुळापासून काढणे हा एकमेव पर्याय असून, तो खूप खर्चिक आहे. त्यामुळे महापालिकेने ड्रेनझाईम (बायो एन्झाईम) चा वापर प्रायोगिक तत्त्वावर केला आहे. त्यासाठी नदीच्या ३ मीटर बाय ३० मीटर क्षेत्रात ड्रेनझाईम पाण्यात सोडण्यात आले, तसेच जलपर्णीवरही फवारण्यात आले होते. सोमवारी ( दि. ५) रोजी ही फवारणी करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या चार तासांतच जलपर्णीवर त्याचा परिणाम दिसला असून, गुरुवापर्यंत ती पूर्णपणे सुकून गेली.
हे बायो एन्झाईम प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात आले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले असले, तरी ते वापरण्यापूर्वी असलेली पाण्याची स्थिती आणि वापरानंतरली स्थिती, याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल. त्यानंतरच, शहरातील इतर ठिकाणी ती वापरण्याबाबत निर्णय घेतला जाईल.- डाॅ. कुणाल खेमणार (अतिरिक्त महापालिका आयुक्त)